नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही? आम्हाला आमचा राजा परत हवा… नेपाळमध्ये मोठ्या घडामोडींना वेग
GH News March 10, 2025 09:14 PM

नेपाळमध्ये वेगळंच चित्र दिसून आलं. माजी राजे ज्ञानेंद्र शहा रविवारी कडक बंदोबस्तात काठमांडूत दाखल झाले असून त्यांच्या स्वागतासाठी राजेशाही समर्थक कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते. ज्ञानेंद्र पोखरा येथून सिमरिक एअरच्या हेलिकॉप्टरने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.

राजाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

‘आम्हाला आमचा राजा परत हवा आहे’, ‘फेडरल प्रजासत्ताक रद्द करा’, ‘राजेशाही पुन्हा स्थापन करा’, ‘राजा आणि देश आमच्या जिवापेक्षा प्रिय आहेत’, अशा आशयाचे फलक जमावाने हातात घेतले होते. 77 वर्षीय ज्ञानेंद्र देशाच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांना भेट देऊन पोखराहून काठमांडूला परतले. विमानतळाबाहेर रस्त्याच्या दुतर्फा ज्ञानेंद्र यांचा फोटो आणि राष्ट्रध्वज घेऊन मोटारसायकलवरून शेकडो समर्थकांनी त्यांचे स्वागत केले.

दंगल विरोधी पोलिसांचा बंदोबस्त

ज्ञानेंद्र आपल्या समर्थकांसह राजवाड्यात प्रवेश करणार असल्याची अफवा पसरल्यानंतर डझनभर दंगल पोलिस नारायणहिती पॅलेस म्युझियम (माजी राजाचा पूर्वीचा राजवाडा) पहारा देत होते. मात्र, ज्ञानेंद्र यांच्या पाठोपाठ जमा झालेला जमाव काठमांडूच्या बाहेरील निर्मल निवास या माजी राजाच्या खासगी निवासस्थानाकडे सरकल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

संपूर्ण नेपाळमध्ये राजेशाही समर्थक रॅली

माजी राजाचे समर्थक गेल्या काही दिवसांपासून काठमांडू आणि पोखरासह देशाच्या विविध भागात रॅली काढून विद्यमान सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत आहेत. जनआंदोलनानंतर 2008 मध्ये संपुष्टात आलेली राजेशाही व्यवस्था पुन्हा सुरू करण्याची मागणी ज्ञानेंद्र यांचे समर्थक करत आहेत.

दरम्यान, सीपीएनचे अध्यक्ष पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आपल्या पक्षाचा सुरू असलेला प्रचार थांबवून ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी काठमांडूला परतले आहेत. देशातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान केपी शर्मा ओली सर्वपक्षीय बैठक बोलवू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.

नेपाळचे माजी पंतप्रधान आणि सीपीएन-युनिफाइड सोशलिस्टचे अध्यक्ष माधवकुमार नेपाळ यांनी शुक्रवारी सांगितले की, देशात पुन्हा राजेशाही प्रस्थापित होण्याची शक्यता नाही. राजेशाहीही आता भूतकाळाची गोष्ट झाली आहे, त्यामुळे त्याची पुन्हा स्थापना होण्याची शक्यता नाही, असे ते म्हणाले. देशाची सेवा करायची असेल तर निवडणूक लढवावी आणि पंतप्रधान व्हावे, असा सल्ला त्यांनी माजी राजा ज्ञानेंद्र यांना दिला.

दरम्यान, विविध कार्यक्रमांमध्ये बोलताना पंतप्रधान केपी शर्मा ओली, नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेरबहादूर देउबा आणि सीपीएन-माओवादी सेंटरचे अध्यक्ष पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी मूठभर लोकांना आपल्या बाजूने वापरून मूर्खपणाची कामे करू नका, असा इशारा माजी राजाला दिला. 2001 ते 2008 या काळात राजेशाही संपुष्टात आल्यानंतर ज्ञानेंद्र हे देशाचे शेवटचे राजे होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.