युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा ही जोडी गेल्या वर्षांपासून चर्चेत होती. खासकरून सोशल मीडियावर ही जोडी सक्रिय असल्याने फॅन फॉलोअर्सही होते. डिसेंबर 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले आणि अवघ्या 4 वर्षात दोघांचा घटस्फोट झाला. 20 मार्च 2025 रोजी त्यांच्या अधिकृत घटस्फोट झाला. वांद्रे फॅमिली कोर्टाने या दोघांच्या घटस्फोट अर्जावर शिक्कामोर्तब केलं आहे. धनश्री आणि चहल यांचं नातं संपुष्टात आल्यानंतर काही दिवसांतच घटस्फोटाची याचिका व्हायरल झाली आहे. यात काही गोष्टी उघड झाल्या आहेत. त्या वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, याचिका दाखल केल्यानंतर लगेच घटस्फोट होत नाही. फॅमिली कोर्ट पती पत्नीची समेट होण्याची शक्यता विचारात घेऊन जोडप्याला सहा महिन्यांचा कालावधी देते. पण या जोडप्याने मुंबई उच्च न्यायालयात जाऊन “आम्ही परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहोत.आम्हाला सहा महिने वाट पाहण्याची गरज नाही,” अशी विनंती त्यांनी याचिकेत केली. याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने कुटुंब न्यायालयाला त्यांना तात्काळ घटस्फोट देण्याचे निर्देश दिले.
मिडिया रिपोर्टनुसार, न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात धक्कादायक बाब उघड झाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये जोडप्याचे लग्न झाले होते. पण जून 2022 मध्येच त्यांचं ब्रेकअप झालं होतं. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लग्नानंतर अवघ्या 19 महिन्यांनी वेगळे झाले होते. अर्जात ही धक्कादायक माहिती नमूद केली आहे. धनश्री आणि चहल जून 2022 नंतर अनेक वेळा एकत्र दिसले होते. वेगळे झाल्यानंतरही ते एकत्र दिसले आणि पोझ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यापूर्वी धनश्रीने तिच्या नावापुढे चहलचा समावेश केला होता. त्यानंतर 2023 मध्ये ते काढून टाकले.
घटस्फोट घेतल्यानंतर युझवेंद्र चहलची एक पोस्ट व्हायरल होत आहे. इंग्रजीतील या पोस्टचा मराठीत अर्थ सांगायचा तर, ‘लग्न हा एक काल्पनिक शब्द आहे. जे मोठं झालेल्या मुलाला दत्तक घेण्यासारखं आहे. ज्यांना सांभाळणं आई वडिलांना शक्य नाही.’ मिडिया रिपोर्टनुसार, युझवेंद्र चहलने धनश्री वर्माला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये दिले आहेत. यापैकी 2.37 कोटी आधीच धनश्री वर्माला दिले आहेत.