Sanjiwaraje Naik-Nimbalkar : 'श्रीराम'चे कामकाज नियमांना धरूनच: संजीवराजे नाईक-निंबाळकर; कारखान्यावर कुठलंही कर्ज नाही
esakal March 23, 2025 11:45 AM

सांगवी/सोमंथळी : शेतकऱ्यांच्या उसाला योग्य दर हवा आहे आणि तो वेळेत मिळायला पाहिजे. स्पर्धात्मक दर आणि उत्तम प्रकारे कारखाना चालवण्याच्या पद्धतीने ‘श्रीराम’चे कामकाज सुरू आहे. कुठल्याही अडचणी नसून सर्व नियमांना धरून त्याठिकाणी कामकाज चालत आहे, अशी स्पष्टोक्ती संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनी दिली.

श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्तीनंतर विरोधकांकडून झालेल्या आरोप- प्रत्यारोपाला उत्तर देताना आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अनिकेतराजे नाईक- निंबाळकर, माजी अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, माजी उपाध्यक्ष नितीन भोसले आदी उपस्थित होते.
संजीवराजे म्हणाले, ‘‘गेल्या दोन वर्षांत एफआरपीपेक्षा अधिक दर श्रीराम- जवाहरने दिला आहे. चालू वर्षी २८८१ एफआरपी होती; आम्ही ३१०० रुपये दर देऊन १०० टक्के देणी अदा केली आहेत.’’

श्रीराम कारखाना आज अवसायनात काढण्याची परिस्थिती असल्याचे व कारखान्याला जवळपास १०० कोटींची देणी असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले. वास्तविक पाहता कारखान्यामध्ये अशी कोणतीही परिस्थिती नसून कारखाना अवसायनात काढायची स्थिती असती, तर आज कारखान्याला ऊसाला दर सुद्धा देता आला नसता. त्याठिकाणी कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत. चालू वर्षी ५ हजार टन ऊस गाळप करून दाखवला आहे. पुढच्या एक- दोन वर्षांत १० हजार टन कारखान्याची गाळप क्षमता होईल. ९० हजार लिटरची डिस्लरी सुरू होईल. श्रीराम- जवाहर एकत्रित काम करत असल्यावरून आरोप झाले आहेत. त्या सर्व आरोपांना कुठलाही आधार नाही. घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला साखर आयुक्त, मंत्री समिती यांची मान्यता घेऊन कामकाज केलेले आहे, असेही संजीवराजे यांनी सांगितले.

...त्यांनी बोलणे हस्यास्पद

कारखाना चालवताना राजकारण आणले नाही. याची माहिती अॅड. नरसिंह निकम यांना आहे. त्यांना व्यवस्थित उत्तरेही दिलेली आहेत. प्रल्हादराव साळुंखे - पाटील यांच्याकडे साखरवाडीचा कारखाना होता. अख्या हंगामाचा एक रुपयाही त्यांनी दिला नाही. त्यांनी साखरवाडीचा कारखाना बुडवला आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं हे हास्यास्पद आहे. त्यांनी केलेले उद्योग दुरुस्त करण्याचे काम रामराजेंना करावं लागलं, अशी टिकाही संजीवराजे यांनी केली.

कारखाना कर्जमुक्त

शासनाची पूर्वीची थकीत देणी, जवाहरचे २२ कोटी आणि पूर्वी घेतलेल्या एच्छिक ठेवींपैकी ४५ लाख रुपये कारखान्याने देणं राहिलं आहे. याच्या व्यतिरिक्त कारखान्यावर सद्यस्थितीत व्याजाचं कुठलंही कर्ज नाही. जवाहरने आत्ता गाळप क्षमता वाढवताना केलेली ८३ कोटीची गुंतवणूकीची रक्कम १५ वर्षानंतर करार संपताना शून्य होणार आहे; तशी कॅश फ्लोची व्यवस्था करुन ठेवलेली आहे. त्यामुळे श्रीरामवर कर्ज आहे, असा कुणीही गैरसमज करुन घेऊ नये, असे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी यावेळी नमूद केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.