‘मँगोनेट’द्वारे ६९९६ बागायतदारांची नोंद
निर्यातीला चालना ; रत्नागिरी जिल्हा देशात अव्वल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : मँगोनेट या प्रणालीद्वारे देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. देशात आंबा निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल असून, राज्यातील १७ हजार ६९१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे देशातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात महाराष्ट्र राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे.
भारतातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जे शेतकरी निर्यातक्षम आंबा उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांनी आपल्या आंबाबागांची आणि शेतीची नोंदणी मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करून घेतली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, देशात एकूण २३ हजार १५७ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी केली आहे; पण त्यातील १७ हजार ६९१ शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी ७६ टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील ६ हजार ९९६ शेतकरी हे केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागा नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून, येथील ६ हजार ९९६ बागांची नोंद झाली आहे तर बीड जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे २२ बागा नोंद आहेत. त्यामुळे सर्वांत जास्त आंबा उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख झाली आहे. जिल्हा कृषी विभागाने याला दुजोरा दिला.
---
जिल्हानिहाय नोंदी
अहिल्यानगर - ४८८
बीड - २२
गोंदिया - २३
नाशिक - ६२७
धाराशिव - १३६३
पालघर - २६
पुणे - ८१९
रायगड - २१७६
रत्नागिरी - ६९९६
सांगली - ४२८
सातारा - १
सिंधुदुर्ग - १७३९
सोलापूर - १२१
ठाणे - १३७६
---
राज्यनिहाय नोंदी
आंध्रप्रदेश - २१४
बिहार - १७५
गोवा - २
गुजरात - १३८
कर्नाटक - २५९
तामिळनाडू - १५९
तेलंगणा - १२८
उत्तरप्रदेश - २६९
महाराष्ट्र - १७ हजार ६९१