Maharashtra Government : ... तर आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू : महसूलमंत्री बावनकुळे
esakal April 06, 2025 01:45 PM

नागपूर : ‘‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याची भरपाई देणे ही सरकारची जबाबदारी आहे. माणिकराव कोकाटे काय बोलले हे मला माहीत नाही. कृषीमंत्री कोकाटे यांनी काही म्हटले असेल तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू,’’ असे स्पष्ट मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे. विदर्भातील नागपूर आणि अमरावती जिल्ह्यामधील पिकांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करणे सुरू आहे. एकही शेतकरी त्यातून सुटू नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांना दिलेली आहे. सर्वेक्षणही सुरू झालेले आहे. महाराष्ट्रसुद्धा एकही शेतकरी सर्वेक्षणातून सुटणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे. ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांना नियमाप्रमाणे मोबदला दिला जाईल.’’

आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना विचारायची गरज नाही. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. ‘त्यांचे लोक आमच्याकडे येत आहे, असे बावनकुळे म्हणाले. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करून विरोधकांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी केलेली आहे, असे संजय राऊत यांचा व्यक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांनी ज्यांची मते घेतली. ते त्या मताशी बेइमानी करत आहेत. मुंबई महानगरपालिकेचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी घेतलेले हे पाऊल आहे. जनता त्यांना माफ करणार नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पतन उद्धव ठाकरे यांनी केलेले आहे, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.

दोषी आढळल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या प्रकाराच्या चौकशीचा आदेश आम्ही दिला आहे.या राज्यातील कुठल्या रुग्णालयामध्ये पैशाकरिता कोणाचा जीव गेल्याचे दिसून आले तर त्याचा कायद्याने परवाना रद्द केला जाईल, अशा इशारा बावनकुळे यांनी दिला. विजय वडेट्टीवार यांनी बालिशपणा सोडला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.