मुंबई : अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंद’ युद्धनौकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि माणुसकीच्या भावनेने एका पाकिस्तानी खलाशाचा जीव वाचला आहे. गंभीर जखमी अवस्थेतील या खलाशावर भारतीय नौदलाच्या डॉक्टरांनी वेळेवर शस्त्रक्रिया केल्यामुळे त्याचा जीव तर वाचलाच, त्याची बोटे निकामी होण्यापासूनही वाचली.
ही घटना ४ एप्रिल २०२५ रोजी घडली. ‘आयएनएस त्रिकंद’ हे भारतीय नौदलाचे जहाज ओमानच्या किनाऱ्यापासून सुमारे ३५० नॉटिकल मैलांवर गस्त घालत होती. याच वेळी ‘इराणी धोवू अल ओमीदी’कडून तातडीचा संदेश मिळाला. या धोवूवरील एक पाकिस्तानी खलाशी इंजिनवर काम करताना गंभीर जखमी झाला होता. त्याला ‘अब्दुल रहमान हंझिया’ या इराणकडे जाणाऱ्या दुसऱ्या मच्छीमार बोटीवर हलवण्यात आले होते.
आयएनएस त्रिकंदने क्षणाचाही विलंब न करता आपला मार्ग वळवला आणि संबंधित नौका शोधून काढली. या नौकेवर ११ पाकिस्तानी (नऊ बलुच, दोन सिंधी) आणि पाच इराणी खलाशी होते. जखमी खलाशाच्या बोटांना फ्रॅक्चर झाले होते आणि रक्तस्राव सुरू होता. आयएनएस त्रिकंदवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने खलाशाला भूल देऊन शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली.