बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या कंपनीच्या खंडणीप्रकरणावरून झाली, त्या आवादा कंपनीत दोन दिवसांपूर्वी मोठी चोरी झाली. अवादा कंपनीत 14 ते 15 जणांच्या टोळक्यांनी तोंडाला मास्क बांधून कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकांचे हात-पाय बांधून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली आणि 12 लाखांच्या केबल्सची चोरी केली. ही माहिती समोर आल्यानंतर आता भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये अजूनही आकाची टोळी कार्यरत आहेत. आकाने जे जागोजागी नेमलेले लोकं आहेत ते अजून जिल्ह्यामध्ये आहेत, असा गौप्यस्फोट केला आहे. (Suresh Dhas reveals that Walmik Karad’s gang is operating in Beed district)
माध्यमांशी संवाद साधताना सुरेश धस यांना अवादा कंपनीतील चोरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आकाच्या लोकांनी दलित समाजातील वॉचमनला मारहाण केली होती. आताही आकाच्याच सहकाऱ्याने हे काम केले असेल. दोन-चार दिवसात आरोपी सापडतील. त्यात शंभर टक्के आकाचेच लोक असतील. कारण आकाची टोळी आजही बीडमध्ये कार्यरत आहे. आकाने जे लोक जागोजागी ठेवले आहेत ते आजही जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत, त्यामुळे ते अजून त्रासदायक आहेत, असे धस म्हणाले.
सुरेश धस पुढे असंही म्हणाले की, चोरी करणारे कोणी भुरटेही असू शकतात. कारण आकाच्या सहकाऱ्यांना यापूर्वी सवयी लावलेल्या आहेत. इकडून नाही मिळालं तर आकाच्याच लोकांनी जावून चोऱ्या करायच्या. हात-पाय बांधल्यानंतर सुरक्षा रक्षक तरी काय करणार? परंतु खंडणी प्रकरणात एका दलित समाजाच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्याच्या नादातच संतोष देशमुखसारखी एवढी मोठी घटना घडलेली आहे. तरीसुद्धा यांचं डोकं जागेवर आलेलं नाही. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या बाबतीत आणखी बरंच काही सापडणार आहे, असा दावा देखील सुरेश धस यांनी केला.