Special Report ST Mahamandal Salary Controversy | कर्मचाऱ्यांचा पगार, मोडावा लागला राजशिष्टाचार
महाराष्ट्रात गावोगावच्या प्रवाशांचं हक्काचं वाहन म्हणजे आपली लालपरी. मात्र ही लालपरी ज्यांच्या जिवावर प्रवाशांना सेवा देते, त्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यात पूर्ण पगार आलाच नाही. राज्य सरकारकडून निधी न आल्यामुळं एकूण पगारापैकी केवळ ५६ टक्के रक्कमच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली. त्यामुळं परिवहन खात्याची जबाबदारी असलेले आणि आजच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा चार्ज घेतलेले मंत्री प्रताप सरनाईक ऍक्शन मोडमध्ये दिसले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अगदी राजशिष्टाचार मोडून त्यांनी अधिकाऱ्यांसोबत खल केला. मग पुढे काय झालं? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची सूत्रं आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हाती घेतली आणि पहिल्याच दिवशी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न ऐरणीवर आला. कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारापैकी ५६ टक्केच पगार खात्यावर जमा झाले. उरलेल्या ४४ टक्के पगारासाठी मंत्री सरनाईकांनी राजशिष्टाचार मोडत अर्थखात्याच्या प्रधान सचिवांची भेट घेतली आणि हा प्रश्न मार्गी लावला. एका मंत्र्यांनी कुठल्याही कामासंदर्भात संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेणं किंवा सचिवांना बोलावून घेणं, हा झाला राजशिष्टाचार. पण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर अर्थमंत्री अजित पवारांऐवजी प्रधान सचिवांना भेटून हा प्रश्न सोडवावा लागल्याची मोठीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.