आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात मंगळवारी 15 एप्रिलला श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने इतिहास घडवला. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आयपीएलमधील सर्वाच निच्चांकी धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आणि विजय मिळवला. पंजाबने केकेआरला 112 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. पंजाबने केकेआरला 15.1 ओव्हरमध्ये 95 धावांवर गुंडाळलं आणि 16 धावांनी सामना जिंकला. विजयानंतर दोन्ही संघांमध्ये हस्तांदोलन झालं. तेव्हा केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे याने पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याला पाहून एकच वाक्य म्हटलं ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
सर्वात छोट्या धावसंख्येचा यशस्वी बचाव केल्याचा आनंद पंजाबच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर होता. केकेआर 112 धावाही करु शकणार नाही, असं कुणीही विचार केला नसेल. मात्र पंजाबच्या गोलंदाजांनी किमया केली आणि विजय मिळवला. सामना गमावल्यानंतर अजिंक्य रहाणे डग आऊटमधून मैदानात हस्तांदोलनासाठी आला. तेव्हा अजिंक्यने श्रेयसकडे पाहून मराठीत एक वाक्य म्हटल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल व्हीडिओनुसार, “काय फालतू खेळलो ना आम्ही”, असं रहाणेने श्रेयसला म्हटल्याची चर्चा रंगली आहे. अजिंक्य आणि श्रेयस दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं नेतृत्व करतात. दोघेही मुंबईकर आहेत.
रहाणेने या पराभवाला स्वत: जबाबदार असल्याचं म्हटलं. तसेच केकेआरची बॅटिंग फार वाईट असल्याचं कबूलही केलं. “या पराभवामुळे फार निराश आहे. मी स्वत: या पराभवासाठी कारणीभूत आहे. मी स्वत: फार वाईट खेळलो.शॉट सिलेक्शन करण्यात कमी पडलो”, असं अजिंक्य रहाणे याने नमूद केलं.
दरम्यान कर्णधार रहाणेने केलेली एक चूक ही चांगलीच महागात पडली. केकेआरची 112 धावांचा पाठलाग करताना 7.3 ओव्हरमध्ये 3 आऊट 62 अशी स्थिती झाली होती. तेव्हा रहाणे आऊट झाल्याने सामना पंजाबच्या बाजूने झुकला.
रहाणे श्रेयसला काय म्हणाला?
पंजाबचा लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने टाकलेल्या गुगलीवर रहाणेने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रहाणे यात अपयशी ठरला आणि बॉल पॅडवर लागला. त्यामुळे फिल्ड अंपायरने रहाणेला एलबीडब्ल्यू आऊट केलं. रहाणेने काही सेकंद नॉन स्ट्राईक एंडला असलेल्या अंगकृष रघुवंशी याच्यासह चर्चा केली. मात्र रहाणे रीव्हीव्यू न घेताच मैदानाबाहेर निघून गेला. रहाणेकडून इथेच मोठी चूक झाली. रिप्ले पाहिल्यानंतर बॉल ऑफ स्टंपबाहेर असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे रहाणेने जर रीव्हीव्यू घेतला असता तर तो नॉट आऊट राहिला असता. मात्र रहाणेच्या आऊट होण्यामुळे सर्व समीकरण बदललं. केकेआरने पुढील 5 विकेट्स या अवघ्या 17 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. आणि केकेआरचा डाव अशाप्रकारे 95 धावांवर आटोपला.