कंपनी देणार १०४ रुपयांचा घसघशीत लाभांश, शेअर्सने गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक
ET Marathi April 17, 2025 02:45 PM
मुंबई : कॉम्प्रेसर, पंप आणि डिझेल इंजिनची उत्पादक कंपनी स्वराज इंजिन्सने जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ नोंदवली. तिमाहीत कंपनीला ४५.४२ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. एक वर्षापूर्वी नफा ३५.१८ कोटी रुपये होता. कंपनीने लाभांश जाहीर करून भागधारकांना खूशखबर दिली आहे. स्वराज इंजिन्सने आर्थिक वर्ष २०२५ साठी अंतिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रति शेअर १०४.५० रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. याआधी कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ साठी प्रति शेअर ९५ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला होता. कंपनीने शेअर बाजारांना सांगितले आहे की या तिमाहीत कामकाजातून मिळणारा महसूल २९.४ टक्क्यांनी वाढून ४५४.१६ कोटी रुपये झाला आहे, जो मार्च २०२४ च्या तिमाहीत ३५१ कोटी रुपये होता. EBITDA देखील २९ टक्क्यांनी वाढून ६२ कोटी रुपये झाला. EBITDA मार्जिन १३.६ टक्के नोंदवले गेले.स्वराज इंजिन्समध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडे ५२.१ टक्के हिस्सा आहे. बीएसईवर १६ एप्रिल रोजी कंपनीचा शेअर ४ टक्क्यांच्या वाढीसह ४१९१.१० रुपयांवर बंद झाला.दिवसभरात हा शेअर ११ टक्क्यांनी वाढून ४,४७८.६० रुपयांवर पोहोचला. शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नवीन उच्चांक आहे. ४ जून २०२४ रोजी २,२७५ रुपयांचा ५२ आठवड्यांचा नीचांक दिसून आला. कंपनीचे मार्केट कॅप ५००० कोटी रुपये आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये ७३ टक्के आणि एका महिन्यात ३३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात शेअरची किंमत १४ टक्क्यांनी वाढली आहे. मार्च २०२५ च्या तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च ३९७.६० कोटी रुपये होता, जो मार्च २०२४ च्या तिमाहीत ३०६.९२ कोटी रुपये होता.