Raigad News: श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू, २ सख्ख्या भावांनी गमावला जीव
Saam TV April 19, 2025 07:45 PM
सचिन कदम, रायगड

रायगडमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनच्या वेळास समुद्र किनाऱ्यावर ही घटना घडली. पोहण्यासाठी तिन्ही तरुण समुद्रात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. स्थानिक नागरिकांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले पण तोपर्यंत उशिर झाला होता. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धननजीकच्या गोंडघर गावातील ३ तरुण आज सकाळी श्रीवर्धनच्या वेळास समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेले होते. हे तिघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. या ३ तरुणांमध्ये दोघे जण सख्खे भाऊ होते. तिन्ही तरुणांना समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. लाटांनी समुद्रात खेचल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. नाका-तोंडात पाणी जाऊन तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्ट्स चालकांच्या मदतीने बुडालेल्या या तिन्ही तरुणांचा शोध घेण्यात आला. तिघांनाही त्यांनी बाहेर काढले. या तिघांचेही शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तरुणांच्या कुटु्ंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. एकाच गावातील ३ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे गोंडघर गावावर शोककळा पसरली आहे.

मयुरेश संतोष पाटील (वय २३ वर्षे), अवधुत संतोष पाटील (वय २६ वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. दोघेही श्रीवर्धन तालुक्यातील गोंडघर गावामध्ये राहणारे होते. हिमान्शु पाटील (वय २१ वर्षे) याचा देखील मृत्यू झाला. हिमान्शु नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये राहत होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.