पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याची शपथ घेतली आहे. भारताने पाकिस्तानवर पहिला स्ट्राइक केला आहे. पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यांचं पाणी बंद करण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे. त्याशिवाय भारतीय सैन्य दलाकडून कुठल्याही क्षणी स्ट्राइक सुद्धा होऊ शकतो. भारताने उचलेल्या या पावलांमुळे पाकिस्तानच टेन्शन वाढलं आहे. या दरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. भारताच्या कुठल्याही आक्रमणाला व्यापक उत्तर देण्याचा ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला आहे. “आपल्या शेजाऱ्याच्या शत्रूत्व भावनेच्या स्वभावामुळे पाकिस्तान नेहमी हाय अलर्टवर असतो” असं ख्वाजा आसिफ म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामध्ये सिंधू नदीच पाणी बंद होण्याची भिती स्पष्टपणे दिसून आली.
“भारत बऱ्याच काळपासून सिंधू जल करारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय. भारताने जर कुठली शत्रूतापूर्ण कारवाई केली, तर पाकिस्तान उत्तर द्यायला संकोच करणार नाही” असं ख्वाजा आसिफ म्हणाले. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आसिफ म्हणाले की, “सिंधू जल करारात जागतिक बँक गॅरेंटर आहे. त्यामुळे भारताला एकतर्फी निर्णय घेण्याचा अधिकार नाही” “आगामी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंधू जल कराराच्या निर्णयावर प्राधान्याने चर्चा होईल” असं आसिफ यांनी सांगितलं. “राष्ट्रीय ओळखीचा विषय येतो, तेव्हा पाकिस्तान देश म्हणून एकजूट होतो. देशाच्या सशस्त्र सेना, यात एअरफोर्सही आहे, ते संरक्षण करण्यास सक्षम आहेत” असं असं ख्वाजा आसिफ म्हणाले.
पाकिस्तानच्या पोकळ धमक्या
मागच्या स्ट्राइकच्या आठवणी ख्वाजा आसिफ अजून विसरलेले नाहीत. “पाकिस्तानला आपल्या शेजारी देशासोबत सामान्य संबंध हवे आहेत. पण चिथावणी दिल्यास उत्तर देण्यासाठी सुद्धा तयार आहोत” असा आसिफ यांचा दावा आहे. “भारताने दुस्साहस केल्यास आम्ही तसच उत्तर देऊ, जसं अभिनंदन प्रकरणाच्यावेळी दिलं होतं. भारताने कारवाई केल्यास आम्ही सडेतोड प्रत्युत्तर देऊ” असं पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.