Maharashtra Live Update : अजितदादांचा अजब दावा : 'आमचे महायुती सरकार 24 तास काम करते...'
Sarkarnama April 26, 2025 10:45 AM
Ajit Pawar : मी पहाटे चारपासून कामाला सुरुवात करतो. रात्री अकरापर्यंत मी काम करतो.

मला सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याची सवय आहे. मी पहाटे चारपासून कामाला सुरुवात करतो. रात्री अकरापर्यंत मी काम करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री अकरापासून मध्यरात्री दोनपर्यंत काम करत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मध्यरात्री दोनपासून चारपर्यंत काम करत असतात, त्यामुळे आमचे महायुतीचे सरकार २४ तास काम करते, असा अजब दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

Devendra Fadnavis News : पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडावा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांचे मॉनिटरिंग सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाकिस्तानी नागरिकांनी तातडीने देश सोडावा, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Rahul Gandhi News : राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये दाखल झाले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमींना ते भेटून त्यांची विचारपूस करणार आहेत. गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पहलगाममध्ये जाऊन घटनास्थळाची पाहणी केली होती. तसेच रुग्णालयात जाऊन जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

Sharad Pawar NCP News : प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रवक्त्यांचे पॅनेल बरखास्त केले आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. मागील काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Maha Yuti Govt : महायुतीमधील कॅबिनेट खात्यांच्या कामांचे ऑडिट

महायुतीमधील कॅबिनेट खात्यांच्या कामांचे ऑडिट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडीया या कंपनीकडून प्रत्येक विभागाचं लेखापरीक्षण अर्थात ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटनंतर एकूण 60 विभागांपैकी सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या आठ विभागांची निवड करण्यात आली आहे. आता या आठ विभागांमधून पहिले तीन विभाग निवडले जाणार आहेत. येत्या आठवडाभरात महायुती सरकारमधील सर्वात चांगली कामगिरी करणारे तीन विभाग कोणते असतील, याचा निकाल जाहीर केला जाईल.

Guru Chichkar : बिल्डर गुरु चिचकर यांनी डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवलं

नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग्ज सिंडिकेटचे प्रमुख नवीन चिचकर यांचे वडील गुरु चिचकर यांनी आज आपल्या राहत्या घरी जीवन संपविल्याची घटना घडली. गुरु चिचकार यांनी स्वत:च्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी गुरु चिचकर यांनी एक सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. जी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केली आहे.

Maha Yuti Govt. : महायुती सरकारचे काम चालते तीन शिप्टमध्ये

पुणे येथे एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचे सरकार 24 तास जनतेच्या सेवेत असते असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिनचर्या सांगितली. ते म्हणाले. मी पहाटे 4 वाजता उठतो. फिरतो, व्यायाम करतो. पहाटे ४ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. यानतंर 10 ते 11 पर्यंत काम करतो. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 11 ते 2 काम करतात. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री 2 ते 4 या वेळेत काम करतात. त्यामुळे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार सदैव तत्पर आहे असे अजित पवार म्हणाले.

कुणाल कामराला अटक करू नका - कोर्ट

कुणाल कामरा याच्या विरोधात दाखल झालेल्या एफआरआयमध्ये अटक करू नका, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे कुमाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारताची ताकद दाखवून द्या - मोहन भागवत

पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताची ताकद दाखवून द्या. हिंदू कधीही कोणाला धर्म विचारून मारणार नाही. मात्र. त्या लोकांनी ते केले आहे. फक्त ताकद असून उपयोग असून उपयोग नाही ती दाखवलीही पाहिजे.

Pahalgam Terror Attack : दोन दहशतवाद्यांची घरं भारतीय सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केली

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित असलेले दोन स्थानिक दहशतवादी आदिल थोकर आणि आसिफ शेख यांची घर भारतीय सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री उद्ध्वस्त केली आहेत.

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक; 2 पोलिस जखमी

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोध मोहीम राबवली आहे. याचवेळी आज बांदीपोरा येथे पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाला आहे, तर दोन पोलिसांना गोळी लागल्याची माहिती आहे.

Nashik News : नाशिकमधील 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणार

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडून जाण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. तर नाशिक पोलिसांना याबाबतचा फॉरेन रजिस्ट्रेशन कार्यलयाकडून अद्याप कोणतेही लेखी आदेश नाही. मात्र, तसा आदेश येताच सरकारच्याआदेशानुसार पोलिस कारवाई करतील. त्यामुळे नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या 6 पाकिस्तानी महिलांना देश सोडवा लागणार आहे.

Simla Agreement : पाकिस्तानकडून सिमला करार स्थगित

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेत सिंधू पाणी करार रद्द केला आहे. त्यानंतर आता पाकिस्तानने देखील सिमला करार स्थगित केला आहे.

Rahul Gandhi visit Kashmir : राहुल गांधी आज काश्मीर दौऱ्यावर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज काश्मीरला जाणार आहेत. ते जीएमसी अनंतबाग येथे जखमींना भेटणार आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी काश्मीरला जात असल्याने हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.