मराठी : बुलढाणा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिक जिथे असतील तिथून पाकिस्तानात ताबडतोब चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला जागेवरच ठोकतील, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिला. बुलढाणा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पहलगाममध्ये झालेला हल्ला हा देशाच्या शत्रूने भारताच्या आत्म्यावर केलेला हल्ला आहे. पाकिस्तानचे कायमचे कंबरडे मोडून नामोनिशाण मिटवले पाहिजे, ही समस्त भारतीयांची भावना आहे. जो आमच्यावर हल्ला करेल तो संपून जाईल, आता पाकिस्तानला संपवायची वेळ आलीय, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. केंद्र सरकार काम करतंय, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात झाली आहे. (will teach Pakistan lesson and erase its name, dcm eknath shinde warns)
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ पाकिस्तानात जा, त्यांना आसरा देणाऱ्या सापांना बिळातून ओढून बाहेर काढू, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. ही देशभक्तीची लढाई आहे आणि देशाच्या सुरक्षेसाठी आमचा शिवसैनिक देशाच्या जवानासारखा लढल्याशिवाय राहणार नाही. हा शेवटचा हल्ला असेल, यापुढे हल्ला करण्याचे धाडस त्यांच्यात उरणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ही आरपारची लढाई आहे, हा घरात घुसून हल्ला करणारा भारत आहे, व्होट बँक आणि मतांच्या लाचारीसाठी शेपूट घालणारा भारत हा नाही, असे ते म्हणाले. सर्व भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहेत, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Ambedkar on Indus Treaty : सरकारने सिंधू पाणी करार रद्द केलेला नाही; प्रकाश आंबेडकरांनी पत्रच दाखवले
रणरणत्या उन्हात हजारो बुलढाणावासीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे या गर्दीला खास धन्यवाद दिले आणि निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. ते पुढे म्हणाले की, जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसैनिक म्हणून सगळी टीम घेऊन तेथे मदतीसाठी धावून जातो. ज्या दिवशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच दिवशी रात्री खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीम श्रीनगरला पोहोचली होती. तेथे थांबलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी संपर्क साधून त्यांना धीर दिला. यात कोणी पती गमावला तर कोणी भाऊ गमावला. या निरपराध पर्यटकांच्या मानसिक अवस्थेची मला जाणीव झाली. त्यांना मानसिक आधार आवश्यक होता. लवकरात लवकर घरी परतायचं अशी त्यांची भावना होती जी त्यांनी फोनवर व्यक्त केली. त्यामुळेच मी अस्वस्थ मनाने श्रीनगर गाठले, पर्यटकांना महाराष्ट्रात परतण्यासाठी व्यवस्था केली. यातून 450 पर्यटकांना परत आणले तर बुलढाण्यातील 51 पर्यटक सुखरुप घरी पोहोचले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मराठी बांधवांना परत आणण्याचे कर्तव्य समजून श्रीनगरला गेलो, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. मराठी बांधवांना परत आणणे हे कर्तव्य समजून श्रीनगर गेलो, मात्र त्यावरुन काहीजणांनी राजकारण केले. सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांनी जनाची नाही मनाची तरी ठेवावी. पर्यटकांच्या मृत्यूंमध्ये त्यांना राजकारण दिसते. कोविडमध्ये मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणारे पाहिले आणि आता पहलगाम हल्ल्याचे राजकारण करणारेही पाहिले, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठा गटावर केली.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अडीच वर्ष आरोप करणारे आता एसंशि म्हणतात त्यावर ते म्हणाले की, एसंशि म्हणजे एसंशिअल अर्थात राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या भावांसाठी आणि लाडक्या ज्येष्ठांसाठी हा एकनाथ शिंदे आवश्यकच आहे. एसंशि म्हणजे एक संवदेनशील शिवसैनिक आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.