जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला आहे. भारताच्या या निर्णयाने पाकिस्तान खूपच अस्वस्थ झाला आहे. त्यांचे नेते आक्रमक वक्तव्य करत आहेत. अणवस्त्र हल्ल्याची पाकिस्तानी नेत्यांची धमकी खूपच हास्यास्पद आहे. कोणी युद्धासाठी भारताला ललकारत आहे. नुकतीच पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी प्रेस कॉन्फरन्स करुन भारताला धमकी दिली. आम्ही मिसाइल्स चौकात सजवायला ठेवलेली नाही, भारतासाठी ठेवली आहेत असं ते म्हणाले.
पाकिस्तानी गृह मंत्री मोहसिन नकवी यांनी थेट युद्धाची भाषा केली. भारताने कुठलही पाऊल उचललं, तर पाकिस्तान युद्धासाठी तयार आहे. पाकिस्तानचे माजी राजदूत अब्दुल बासित यांनी या वर्तनासाठी पाकिस्तानी मंत्र्यांना खूप सुनावलं आहे. ‘पाकिस्तानी मंत्र्यांनी आपला शत्रू भारताकडून काहीतरी शिकावं’ असं अब्दुल बासित म्हणाले.
प्रत्येकजण चौधरी बनला आहे
“पहलगामच्या घटनेनंतर पाकिस्तानाच प्रत्येकजण चौधरी बनला आहे. कोणीही प्रेस कॉन्फरन्स करतोय. जास्त नाही, कमीत कमी आपला शत्रू भारताकडून काहीतरी शिका. प्रेस कॉन्फरन्स करुन मीडिया अटेंशन मिळवण्याची तिथे कुठलीही स्पर्धा लागलेली नाही. संघटितपणे ते पुढे जाऊन आपलं उद्दिष्ट्य गाठण्याचा ते प्रयत्न करत आहेत” असं अब्दुल बासित म्हणाले.
कधी इथे-तिथे खाजवत होते
“आमच्याकडे सगळ्यांसाठी हा मोफतवाला विषय आहे. इतका गंभीर विषय आहे की, भारताकडून कुठली ना कुठली कारवाई होणार. आपण सावधपणे बोलण्याची ही वेळ आहे” असं अब्दुल बासित यांनी सांगितलं. “मनात आलं की, कोणालाही पत्रकार परिषद घेण्याची परवानी असू नये. आपले संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला जो इंटरव्यू दिला, त्यात त्यांची बॉडी लँगवेज योग्य नव्हती. कधी ते केस व्यवस्थित करत होते. कधी इथे-तिथे खाजवत होते. त्यांनी उत्तरही नीट दिलं नाही” असं अब्दुल बासित म्हणाले.
कोणाच्या परवानगीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली?
पाकिस्तानचे रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांनी अब्दुल बासित यांनी सुनावलं. “रेल्वे मंत्र्याच या विषयाशी काही देणं-घेणं नाहीय. कोणाच्या परवानगीने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांना पत्रकार परिषद घ्यायची परवानगी दिली असेल, तर संकटकाळात स्थिती कशी हाताळायची याची पंतप्रधानांना कल्पना नाही” अशा शब्दात माजी पाकिस्तानी डिप्लोमॅट अब्दुल बासित यांनी पाकिस्तान सरकारला त्यांची लायकी दाखवली.