भगवानगडावरील मातीचे
मुंबईतील होणार पूजन
संगमेश्वर ः महाराष्ट्र महोत्सवाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रथयात्रेत महामानवांचे, महापुरुषांचे वास्तव्य लाभलेल्या, महान व्यक्तींच्या कार्याने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून वैशिष्ट्यपूर्ण नद्या आणि संगम येथील पाणी आणि माती आणून हे मंगल कलश मुंबईत एकत्र आणले जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतून येत्या १ मे पर्यंत हे सर्व मंगल कलश मुंबईत आणले जातील. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजवाडी येथील भगवानगड येथील गावातील मातीचे पूजन करून, ती माती कलशामध्ये घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य स्थापनेला ६५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार शेखर निकम यांच्या सूचनेनुसार हा कलश मुंबईत रवाना करण्यात येत आहे. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा बँक संचालक राजेंद्र सुर्वे, कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओकटे, तुरळ सरपंच सहदेव सुवरे, राजवडीचे माजी सरपंच संतोष भडवळकर, प्रदिप शिर्के, राजवाडी विकास सोसायटी चे चेअरमन दिलीप म्हादे, मयूर भिंगार्डे आदी उपस्थित होते.