जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर मुख्यमंत्री अब्दुल्ला यांची पंतप्रधान मोदींची ही पहिलीच भेट होती. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ३० मिनिटं बैठक झाली. या बैठकीत पहलाग हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या सुरक्षेच्या स्थितीसह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बैठकीआधी नॅशनल कॉन्फरन्सच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, उमर अब्दुल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून केंद्र सरकारच्या कोणत्याही निर्णयात जम्मू काश्मीर प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य करणार असल्याचा विश्वास देणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला घेणं आणि देशाच्या सुऱक्षेच्या मुद्द्यावर केंद्राच्या भूमिकेत काश्मीर सरकार सहकार्य करेल.
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरक्षेचं आव्हान निर्माण झालं आहे. त्यातच केंद्र सरकार पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भेट झालीय.
काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन केलं होतं. हल्ल्यात सहभागी असलेले लोक हे माणुसकीचे शत्रू आहेत. ते नरकात सडतील अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. पाकिस्तानविरोधात काय भूमिका घ्यायची हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार आहे. त्यात मी काही बोलणार नाही असंही ते म्हणाले.