Maharashtra Board 12th Result 2025 Declared : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तसेच विभागीय मंडळातून कोकण विभागानं बाजी मारली आहे. महाराष्ट्र बोर्डाने नुकतंच पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. या निकालात त्यांनी विभागनिहाय आकडेवारी, तसेच बारावीच्या कोणत्या विभागाचा निकाल काय याबद्दलची सविस्तर माहिती सांगितली आहे.
महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा बारावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या सर्व विभागातील मिळून १४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. यंदा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. १४ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांनी नोंद केली. १४ लाख १७ हजार ९६९ बसले. १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी पास झाले आहेत. बारावीचा निकाल जाहीर झाला असून कोकण विभाग अव्वल आहे. यंदाही मुलींची बाजी मारली आहे.
यंदा बारावीची परीक्षा नियमित वेळेआधी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली होती. या परीक्षेनंतर तात्काळ पेपर तपासणीचे काम शिक्षकांनी केले. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांचा निकाल नियमित वेळेपेक्षा लवकर जाहीर झाला.
कोकण -९६.७४ कोल्हापूर – ९३.६४ मुंबई – ९२.९३ संभाजीनगर – ९२.२४ अमरावती – ९१.४३ पुणे -९१.३२ नाशिक -९१.३१ नागपूर – ९०.५२ लातूर – ८९.४६
बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ४९ हजार ९३२ इतकी आहे. यात फर्स्ट क्लास आणि त्याच्या पुढे संख्या ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी आहेत. तसेच द्वितीय श्रेणी म्हणजे ४५ टक्के ते ५९. ९९ टक्के मिळवलेले विद्यार्थी ५ लाख ८० हजार ९०२ इतके आहेत. तर ३५ टक्के ते ४४.९९ टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ६४ हजार ६०१ इतकी आहे. असे एकूण १४ लाख ६४ हजार ६०१ पैकी एकूण १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.