सोलापूर : पत्नी डॉ. उमा वळसंगकर यांना आपल्या रुग्णालयाचे सर्व अधिकार कागदोपत्री सोपवूनच डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली होती, अशी माहिती आता पुढे आली आहे. चारच वर्षांपूर्वी स्वत:च्या रुग्णालयाची ५० टक्के मालकी सून डॉ. शोनाली आणि मुलगा डॉ. अश्विन यांच्या नावे केली होती. मात्र, गृहकलहामुळे गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी रुग्णालयाचे संपूर्ण अधिकार पत्नी डॉ. उमा यांच्याकडे सोपवण्याची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली होती, अशी माहिती डॉ. शिरीष यांच्या निकटवर्तीय व्यक्तीने ‘सकाळ’ प्रतिनिधीला दिली. आत्महत्येच्या घटनेनंतर तीन-चारच दिवसांत सून डॉ. शोनाली यांना घर सोडावे लागले. त्यांना रुग्णालयाच्या कामकाजापासूनही दूर केले असून रुग्णालयाची धुरा आता डॉ. उमा यांनी हाती घेतल्याचेही त्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
डॉ. शिरीष हा अनेक महिन्यांपासून त्रस्त असायचा. त्याची स्वत:च्याच रुग्णालयात गळचेपी होत असल्याने त्याने वाडीया रुग्णालयात पूर्णवेळ सेवा बजावण्याची तयारी ठेवली होती. वाडीया हॉस्पिटलमध्ये रुजू होणाऱ्या डॉक्टरांच्या मुलाखती तोच घेत होता. अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर ३० मे रोजी वाडीया रुग्णालय सुरू करण्याचेही नियोजन होते. आठ दिवसांपूर्वी ‘वाडीया’त आल्यावर त्याचा चेहरा पडलेला होता. त्याचे कारण त्याला विचारले तेव्हा त्याने सुनेसंदर्भात सांगितले होते. त्यावेळी ‘सुनेला मी बोलू का’ असे म्हटल्यावर शिरीषने ‘मुलगा डॉ. अश्विन काढेल काहीतरी मार्ग’ असे देखील सांगितले होते. तो सतत डिप्रेशनमध्ये होता, चहा आणि सिगारेटवर तो दिवस दिवस काढायचा. त्याचे डिप्रेशन किती वाढले हे आम्हाला समजलेच नाही, अशी खंत डॉ. शिरीष यांच्या जवळच्या मान्यवर व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘सकाळ’कडे व्यक्त केली.
अटकेतील मनीषा मुसळे मानेंचाही असाच दावा
डॉ. वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली यांना आपले शिक्षण पती डॉ. अश्विन आणि सासरे डॉ. शिरीष यांच्यापेक्षा जास्त आहे, असे वाटायचे. तिघांचे रुग्ण वेगवेगळे होते, यातून त्याच्यांत वादविवाद व्हायचे. डॉ. शिरीष हे गोरगरिब रुग्णांचे बिल कमी करायला सांगायचे, पण माझा रुग्ण असल्याचे सांगून डॉ. शोनाली बिल कमी करत नव्हत्या, असे अटकेतील मनीषा मुसळे माने यांनी पोलिसांना सांगितले आहे. आत्महत्येच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनीही कौटुंबिक कारणातूनच हा प्रकार झाल्याचे म्हटले होते. नंतर पोलिसांनी गृहकलहाच्या अंगाने तपास केला किंवा नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
तपास ‘सीआयडी’कडे द्या अन् ‘एसआयटी’ चौकशीचीही मागणी
डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येला दुसरी बाजूसुद्धा आहे. पण, पोलिसांकडून त्यादृष्टीने तपास होत नसल्याने गुन्ह्याचा तपास ‘सीआयडी’कडे सोपवावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याशिवाय शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी तपास शांत, चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे गृहराज्यमंत्र्यांकडे केली आहे.