भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर काही दिवसांनी आयपीएलच्या 18 व्या मोसमातील उर्वरित सामन्याचं आयोजन केलं जाणार असल्याचं निश्चित होतं. त्यानुसार बीसीसीआयने 12 मे रोजी रात्री उशिरा उर्वरित सामन्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार, बीसीसीआयने 13 साखळी आणि 4 प्लेऑफ असे एकूण 17 सामने हे 17 मे 3 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. मात्र बीसीसीआयने या नव्या वेळापत्रकासह क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे. भारतातील 5 शहरांमध्ये उर्वरित आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं नाही. बीसीसीआयकडून फक्त 13 सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलंय. तर प्लेऑफच्या सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलेलं नाही.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे बीसीसीआयने 9 मे रोजी आयपीएलचा 18 वा मोसम आठवड्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तर त्याआधी 8 मे रोजी धरमशाळा येथे आयोजित करण्यात आलेला पंजाब विरुद्ध दिल्ली सामना मध्येच थांबवण्यात आला. त्यामुळे बीसीसीआयने आगामी 17 सामन्यांचं आयोजन हे सीमेनजीक असणाऱ्या 5 शहरांमधील स्टेडियममध्ये करणं टाळलं आहे. तसेच सीमेपासून दूर असणाऱ्या 6 शहरांची निवड उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सामने याआधी बंगळुरु, जयपूर, दिल्ली, लखनौ, चेन्नई, धर्मशाळा, कोलकाता, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, मुल्लानपूर, विशाखापट्टणम आणि गुवाहाटी या शहरांमध्ये आयोजित करण्यात आले होते. मात्र आता दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित सामने हे 13 शहरांमधील 6 शहरांमधील स्टेडियममध्येच होणार आहेत.
साखळी फेरीतील 13 सामने हे बंगळुरु (एम चिन्नास्वामी स्टेडियम), सवाई मानसिंह स्टेडियम (जयपूर), अरुण जेटली स्टेडियम (नवी दिल्ली), भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम (लखनौ) आणि वानखेडे स्टेडियम (मुंबई) आणि नरेंद्र मोदी स्टेडियम (अहमदाबाद) येथे खेळवण्यात येणार आहेत. तर प्लेऑफच्या 4 सामन्यांचं ठिकाण जाहीर करण्यात आलेलं नाही.
धरमशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट स्टेडियम सीमेपासून काही किमी अंतरावर आहे. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून तिथे सामने आयोजित करण्यात आलेले नाहीत. तसेच धरमशाळा व्यतिरिक्त चेन्नई, मुल्लानपूर, कोलकाता आणि हैदराबाद येथेही सामने होणार नाहीत. चेन्नई, मुल्लानपूर आणि कोलकाता ही शहरं भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळ आहेत. त्यामुळे फक्त 6 शहरांमध्येच सामने होणार आहेत.