Baloch Liberation Army: पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची नऊ तळ उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला होता. परंतु भारताकडून जबर नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानने 10 मे रोजी शस्त्रसंधीचा प्रस्ताव दिला. भारताच्या या शस्त्रसंधीनंतर बलुचिस्तानमधील बलुच आर्मीने (बीएलए) महत्वाचे वक्तव्य केले आहे. पाकिस्तान हा ज्वालामुखीवर बसलेला देश आहे. त्याला आम्ही संपवून टाकू. त्यासाठी भारताकडून आम्हाला मदत हवी आहे. भारताने तीन गोष्टींसाठी आम्हाला मदत केली तर आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू, असे बीएलएने म्हटले आहे.
द बलूचिस्तान पोस्टमधील माहितीनुसार, शस्त्रसंधीनंतर बीएलएने एक निवेदन काढले. त्यात म्हटले की, पाकिस्तान दहशतवादला मदत करणारा देश आहे. त्याच्यासोबत कुटनीती संबंध ठेवणेही मुर्खपणा आहे. भारताने आम्हाला पाकिस्तासोबत लढण्यासाठी मदत केली तर आम्ही पाकिस्तानला धडा शिकवणार आहे. दहशतवादाचा सूत्रधार असणारा पाकिस्तानला पूर्णपणे नष्ट करु. बीएलएने म्हटले आहे की, जर बीएलएला भारताकडून राजकीय, कुटनीती आणि संरक्षण पाठिंबा मिळाला तर पाकिस्तानचे नामोनिशान मिटवून टाकू. पाकिस्तान दहशतवाद्यांना संरक्षण देतो. अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा हा खेळ सुरु आहे.
बलुचिस्तानने पुन्हा एकदा जगाकडून मदतीची मागणी केली आहे. जर वेळेपूर्व पाकिस्तानला संपवले नाही तर हा देश जागासाठी धोकादायक बनेल. भारताने जर पाकिस्तानचे विभाजन केले तर आम्ही त्यांना धडा शिकवू शकतो. भारताचा निर्णय होताच आमचे सैनिक पाकिस्तानला पश्चिमी सीमेतून घेरण्यास सुरुवात करतील. पाकिस्तानला फक्त आम्हीच संपवू शकतो. त्यासाठी आमचा प्लॅनसुद्धा तयार आहे.
बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला अल्टीमेटम दिले आहे. बलुच आर्मीने म्हटले की, बलुचिस्तान स्वातंत्र होईल, तो दिवस दूर नाही. त्याला जगातील कोणतीही शक्ती आता थांबवू शकत नाही. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यास जितका उशीर होईल, तितके रक्तपात वाढणार आहे. आम्ही आमच्या अभियानातून मागे सरकणार नाही.