मुंबई : सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजार मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (BSE Sensex) 1.55 टक्के तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांत निफ्टीमध्ये (Nifty 50) 1.39 टक्क्यांची घसरण झाली. सेन्सेक्स 1281 अंकांनी घसरून तो 81,148 वर तर निफ्टी 346 अंकांनी घसरून तो 24,578 वर पोहोचला. शेअर बाजारातील पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.28 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोमवारी सेन्सेक्समध्ये जवळपास 3000 अंकांनी वाढ झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
कॅपिटल गुड्स, मीडिया, सार्वजनिक बँका, फार्मा इंडस्ट्री कंपन्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 1 ते 1.6 टक्क्यांची वाढ झाली. तर आयटी, मेटल, एफएमजीसी, ऑईल अँड गॅस क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये 1 ते 2.5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Power Grid Corp, Infosys, Eternal, TCS, HCL Technologies या कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. तर Bharat Electronics, Jio Financial, Hero MotoCorp, Dr Reddy’s Labs आणि Sun Pharma या कंपन्यांना काहीसा फायदा झाल्याचं दिसून आलं.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यान तणाव कमी झाला आणि शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं होतं. सोमवारी सेन्सेक्समध्ये जवळपास 3000 अंकांची तर निफ्टीमध्ये जवळपास 900 हून जास्त अंकांची वाढ झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकन डॉलर (DXY निर्देशांक) ची मजबूती आणि काही प्रमाणात भू-राजकीय तणाव यांचाही आज शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. अस असले तरी सीमेवर ड्रोन आणि शोपियानमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान, अमेरिकन डाउ जोन्स फ्युचर्स देखील भारतीय वेळेनुसार किरकोळ तोट्यासह व्यवहार करत होते, जे गुंतवणूकदारांमध्ये सावधगिरीचे प्रतिबिंब मानले जात आहे.
अधिक पाहा..