मोठी बातमी! भारताचा पाकला मोठा झटका, सिंधूचं पाणी मिळणार नाहीच, अधिकृत भूमिका समोर
GH News May 13, 2025 09:07 PM

Sindhu Water Treaty :  गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध कमालीचे ताणले आहेत. सध्या या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने तसेच पाकिस्ताने एकमेकांच्या विरोधात घेतलेले निर्णय कायम आहेत. असे असतानाच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानबाबतच्या धोरणावर अधिकृत भूमिका सांगितली आहे. सिंधू जलवाटप कराराला देण्यात आलेली स्थगिती कायम राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने नेमकं काय सांगितलंय?

एक चांगली भावना तसेच मैत्रिपूर्ण संबंधाला समोर ठेवून सिंधू जलवाटप करार करण्यात आला होता. गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाला खतपाणी घालून पाकिस्तानने मात्र या धारणाले हरताळ फासला आहे. त्यामुळे सीसीएसच्या निर्णयानुसार सीमेपलिकडच्या दहशतवादाला पाकिस्तान जोपर्यंत संपवत नाही, तोपर्यंत सिंधू जलवाटप करार स्थगितच राहील, असं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे.

गोळीचं उत्तर गोळीनंच देऊ

तसेच, पाकच्या गोळीचं उत्तर आम्ही गोळीनंच देऊ. भारताने पाकमधील तळांना टार्गेट केलं. 10 मे रोजी पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त केले. हवाई तळ नेस्तनाबूत झाल्यावर पाक नरमला.  पराभव झाला तरी ढोल वाजवणं ही पाकिस्तानची सवय आहे, असंदेखील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला सुनावलं आहे.

भारताच्या भूमिकेचा नेमका अर्थ काय?

भारताने पाकिस्तानसोबतच्या सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती कायम राहील अशी भूमिका घेतली आहे. तसेच पाकिस्तान जोपर्यंत त्यांच्या देशात पोसला जाणारा दहशतवाद संपवणार नाही, तोपर्यंत या कराराला स्थगिती कायम राहील असंही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. म्हणजेच आता पाकिस्तानला सिंधू जलवाटप कराराअंतर्गत भारतातून जाणाऱ्या नद्यांचं पाणी हवं असेल तर अगोदर या देशाला त्यांच्या भागातील दहशतवादाला संपवावं लागणार आहे. सीमाभागात असलेल्या दहशतवादी तळांना नष्ट करावं लागणार आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय निर्णय घेतला होता?

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली होती. भारताने तत्काळ प्रभावाने सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिली होती. तसेच भारतात व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर सिंधूचे पाणी रोखल्यास आम्ही त्याला युद्ध छेडण्याची क्रिया समजू अशी पोकळ धमकी पाकिस्ताननं दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांतील वाद वाढत गेला. भारताने पुढे ऑपरेशन सिंधू राबवून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.