सांगली : अलमट्टी धरणाची उंची सध्याच्या ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून केंद्र सरकारकडे वारंवार मागणी केली जात आहे. या मागणीला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ठोस कायदेशीर पावले उचलली जात नाही. अर्थात धरणाची उंची वाढविण्याला होत असलेला विरोध वाढत असून यासाठी आज अंकली टोल नाक्यावर सर्वपक्षीय चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय कृती समितीकडून सांगली कोल्हापूर मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अलमट्टी धरणाची वाढविण्यात येणारी उंची रद्द करावी; यासाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय पक्ष सामाजिक संघटना या आता एकत्र आले आहेत. या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव टाकण्यासाठी ते आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे.
त २००५ यावर्षी प्रथमच पाण्याची पातळी ५१९ मीटरच्या वर नेण्यात आली होती. तर त्यावर्षी महाराष्ट्रात महापूर आला. त्यानंतर ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, त्या वर्षी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये महापूराची तीव्रता अधिक असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. दरम्यान या पूरस्थितीस अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही सरकार या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने हे आंदोलन उभारण्यात येत आहे. यामुळे कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार देखील करण्यात आला आहे.
पोलीस बंदोबस्त तैनात
चक्काजाम आंदोलनामध्ये कोल्हापूर काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अरुण लाड, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, आमदार रोहित पाटील, खासदार विशाल पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उदगावच्या टोल नाक्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.