पालघर, ता. २४ (बातमीदार) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषी बी-बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे शेतकऱ्यांच्या कृषिसंबंधित तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाच्या निविष्ठा मिळाल्या असतील किंवा फसवणुकीचा अनुभव आला असेल, तर त्यांनी तातडीने जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय भरारी पथकांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदवून त्यांचे त्वरित निवारण करून घ्यावे, असे जिल्हास्तरीय भरारी पथकप्रमुख सोमनाथ पिंजारी यांनी सांगितले. या उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी निविष्ठांशी समस्यांचे त्वरित आणि प्रभावी निवारण मिळण्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषी अधिकारी (पथक प्रमुख), कृषी अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे. ही पथके तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करतील.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळाव्यात आणि त्यांची कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून या भरारी पथकांमुळे शेतकऱ्यांना तक्रार निवारणाची प्रभावी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्पष्ट केले आहे.
पथकातील अधिकारी
जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत आहे. या पथकात उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे, मोहीम अधिकारी ए. जे. राऊळ, वजने व मापे निरीक्षक काकासाहेब भालेकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक लक्ष्मण लामकाने हे सदस्य सचिव म्हणून कार्यरत आहेत.