नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती ही सुरूच आहे. ठाकरेंच्या सेनेत रोज कोणी ना कोणी प्रवेश करत असले तरी त्यांच्या पक्षातील आऊट गोइंग सुद्धा सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी ठाकरेंची साथ सोडलेली असताना, त्यापाठोपाठ आता माजी आमदार निर्मला गावित यांनी सुद्धा पक्षाचा राजीनामा दिला आहे. माजी आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या निर्मला गावित यांचा ठाण्यात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पण निर्मला गावित यांच्या पक्षप्रवेशामुळे आता शिंदेंची नाशकात ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics Big blow to Uddhav Thackeray in Nashik, female deputy leader Nirmala Gavit joins Shiv Sena)
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे गावित यांचा शिवसेनेतील प्रवेश हा शिंदेंना या दोन्ही मतदारसंघात आपली ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. माजी आमदार गावित यांच्या प्रवेशामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच निर्मला गावित यांचा राजीनामा हा ठाकरे पक्षाला धक्का तर उपमुख्यमंत्री शिंदे यांना लाभदायी ठरणार असल्याचे दिसते.
हेही वाचा… Sanjay Raut on Narayan Rane : राणेंच्या तोपाचे केसही…, संजय राऊतानी घेतला समाचार
निर्मला गावित या काँग्रेस पक्षाच्या इगतपुरी मतदार संघातील दोन टर्म आमदार होत्या. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वातील मतभेदांमुळे तो प्रवेश होऊ शकला नाही. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत गावित यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून घोषित केले होते. या निवडणुकीत पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. मात्र त्या पराभूत झाल्या.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना इगतपुरी येथे येऊन दूर गेलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र करण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वात गोंधळ असल्याने पक्षासाठी हे काम कोणीही करू शकले नाही. संदर्भात नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नेते देखील उदासीन असल्याने या पक्षाची अवस्था बिकट झाल्याचे दिसते. त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.