66748
वैभववाडीतील कामांची चौकशी करा
मंगेश लोके ः जिल्हाधिकाऱ्यांसह नगरविकास अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २८ ः वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून कोट्यवधीची कामे शहरात सुरू आहेत. परंतु, या कामांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात आहे. गटारांची कामे करताना त्यामध्ये पाणी जाईल की नाही? याची खातरजमा केलेली नाही. त्यामुळे सर्व पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन नगरविकास अधिकारी विनायक औंटकर यांनाही दिले.
निवेदनात म्हटले आहे की, वैभववाडीच्या विकासाकरीता पालकमंत्री नीतेश राणे यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायतीला उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रस्ते, गटारे आणि इतर विकासकामे केली जात आहेत. वैभववाडी शहरात सुरूवातीला दत्त मंदिर ते सावली हॉटेल आणि सावली हॉटेल ते नारायण वडापाव सेंटर हे गटारकाम करण्यात आले. याशिवाय नगरपंचायत ते सांगुळवाडी रस्ता आणि आता नव्याने भर पावसात बसस्थानक ते संभाजी चौक असे नवीन गटाराचे बांधकाम सुरू आहे. कोटी ते दीड कोटी रूपये गटार बांधकामावर खर्च झाले आहेत. मात्र, बांधकाम केलेल्या गटारातून पाणीच वाहत नसल्याचे दिसून येत आहे. गटारातून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आज अक्षरक्षः वैभववाडी तुंबली आहे. गुडघाभर पाणी शहराच्या काही भागात साचले आहे. नियोजन शून्य कारभारामुळे वैभववाडी शहरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस सुरू असताना कामे केली जात असल्याने सर्व शहरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. गटारांची कामे देखील निकृष्ट पद्धतीने सुरू आहेत. गटारालगतच नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी घातली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या शहरातील नागरिकांसमोर निर्माण होणार आहेत. त्यामुळे बांधकाम केलेल्या गटारातून जोपर्यंत पाणी जाऊन लोकांची समस्या सुटत नाही, तोपर्यंत ठेकेदारांना बिले अदा करू नयेत, अशी मागणी श्री. लोके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
---
अनागोंदी कारभाराची पाहणी करा
वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी करावी, नगरपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करावी, अशी देखील मागणी श्री. लोके यांनी केली आहे. येत्या काही दिवसांत यासंदर्भात ठोस कार्यवाही झाली नाही तर या सर्व प्रकाराविरोधात आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन नगरविकास अधिकाऱ्यांना देखील देण्यात आले आहे.