सांगली - सांगली जिल्ह्यात वरिष्ठ निरीक्षकास बलात्कार प्रकरणात वाचवण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप खुद्द पीडितेने केला आहे.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांच्या पत्रकार परिषदेत पीडितेने झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. चार वर्षांपासून उंबरे झिजवत असून माझ्यावर दबाव टाकून फिर्याद मागे घेण्यास भाग पाडले. त्यानंतर पुन्हा सामूहिक बलात्कार झाला.
अजून माझ्यावर किती अत्याचार करणार, असा सवालही तिने पाणावलेल्या डोळ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अनिल देशमुखांसह साऱ्यांवर कारवाईसाठी मी आंदोलन करणार असल्याचेही तिने जाहीर केले. त्याला तृप्ती देसाई यांनी पाठिंबा दिला.
तृप्ती देसाई यांच्या उपस्थितीत पीडितेने सांगलीत कैफियत मांडली. त्या म्हणाल्या, ‘सन २०२० मध्ये कडेगावचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीत मार्गदर्शनाच्या निमित्ताने घरी नेऊन बलात्कार केला. याप्रकरणात राज्यभर आंदोलन सुरू झाले.
तेव्हा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्याची विनंती करून पुनर्वसनाची हमी दिली. मी नकार दिल्यानंतर मला त्यांच्या पीएमार्फत दीड कोटींची ऑफर दिली गेली.
त्यानंतर तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, इस्लामपूरचे तत्कालीन उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, यांनी सांगलीत हॉटेलमध्ये चार दिवस नजरकैदेत ठेवले. त्यानंतर सतत दबाव टाकून गुन्हा मागे घ्यायला लावला. निरीक्षक हसबनीस याने अत्याचारानंतर वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. माझे कॉल रेकॉर्डिंग तपासले गेले.
माझा पाठलाग करून नोकरीच्या ठिकाणी त्रास दिला. माझ्यावर पुन्हा सामूहिक बलात्कार झाला. तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी माझी तक्रार ऐकून घेत गुन्हा नोंदविला गेला. मला न्याय मिळाला नाही, पुनर्वसन झाले नाही. रूपाली चाकणकर यांना काही दिवसांपूर्वी भेटल्यानंतरही त्यांनीही अशा घटना घडतात, असे सांगून टाळले.
त्यामुळे हसबनीस आणि त्याला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मागे घ्यायला लावलेली केस पुन्हा न्यायालयासमोर आणावी. माझ्यावरील अत्याचाराचे, दबावाचे पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचेही पीडितेने जाहीर केले.