Omar Abdullah : राज्याची मागणी कायम; उमर अब्दुल्लांचे स्पष्टीकरण, चर्चा थांबलेली नाही
esakal May 29, 2025 11:45 AM

गुलमर्ग : ‘‘जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासंबंधीची चर्चा पहलगाम हल्ल्यामुळे थांबलेली नाही, असे सांगत हा मुद्दा नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मी उपस्थित केला होता,’’ असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी बुधवारी स्पष्ट केले.

उत्तर काश्मीरमधील प्रसिद्घ पर्यटन स्थळ गुलमर्गला अब्दुल्ला बैठक घेतली. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या चर्चेवर परिणाम झाला का, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘ तसे अजिबात नाही.जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची चर्चा थांबलेली नाही.

नीती आयोगाच्या बैठकीतील प्रसारित झालेले औपचारिक भाषणावर नजर टाकली तर राज्याचा दर्जा परत मिळावा, अशी भूमिका मांडल्याचा स्पष्ट उल्लेख तुम्हाला आढळेल. भाषणाची प्रत पंतप्रधान आणि नीती आयोगाच्या कार्यकारी मंडळातील सर्व सदस्यांना देण्यात आली होती.’’

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा उपयोग राज्याच्या दर्जावर चर्चा करण्यासाठी मी करू शकलो नाही. पण याचा अर्थ चर्चा थांबली आहे, असा नव्हे. यावर बोलणी सुरूच आहेत, असे ते म्हणाले.

सहली काढण्याची सूचना

देशाच्या इतर भागातील लोकांनी काश्मीरला येण्यास सुरुवात करावी, अशी अपेक्षा करण्याआधी काश्मिरी लोकांनी खोऱ्यातील पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असे आवाहन अब्दुल्ला यांनी केले. तसेच येथे प्रसिद्धीभिमुख आणि उत्साहपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. शाळा व महाविद्यालयांच्या सहली सुरू करण्यास सांगितले आहे. जेणेकरून सामान्य परिस्थितीकडे परत निर्माण होऊ शकेल,’’ असे ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.