भारतीय क्रिकेट संघ सध्या संक्रमण अवस्थेत आहे. दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीमुळे संघ कात टाकत असल्याचं दिसत आहे. आर अश्विन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या दिग्गज खेळाडूंची जागा भरून काढणं वाटतं तितकं सोपं नाही. असं असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यातून निवृत्तीचे संकेत मिळू लागले आहेत. जसप्रीत बुमराहने एका मुलाखतीत करिअरपेक्षा कुटुंब महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. 20 जूनपासून भारत इंग्लंड कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत बुमराह भारतीय संघाची ताकद असणार आहे. पण सर्व कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत शंका आहे. कारण दुखापतीमुळे तसं होणं शक्य नाही. असं असताना बुमराहच्या वक्तव्याने टेन्शन वाढलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने जसप्रीत बुमराहची मुलाखत घेतली. यावेळी त्याने बुमराहने वर्कलोड, कुटुंब यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्याने स्पष्ट केलं की करिअरपेक्षा कुटुंब महत्त्वाचं आहे. बियॉन्ड 23 पॉडकास्टवर जसप्रीत बुमराहने सांगितलं की, ‘माझ्यासाठी करिअर पेक्षा माझं कुटुंब महत्त्वाचं आहे. कारण ते कायमस्वरूपी आहे. मी दोन गोष्टी खूपच गंभीरतेने घेतो. एक कुटुंब आणि दुसरा माझा खेळ. पण कुटुंब पहिलं येतं.’
जसप्रीत बुमराहने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकल क्लार्कला सांगितलं की, ‘इंग्लंडमध्ये खेळणं हे वेगळं आव्हान आहे. मला ड्यूक्स चेंडूने गोलंदाजी करायला आवडतं. तिकडचं वातावरण, स्विंगिंग कंडीशन्स आणि जेव्हा चेंडू सॉफ्ट होतो तेव्हा गोलंदाजी करणं सोपं नसतं. यासाठी मी इंग्लंडमध्ये खेळण्यास उत्सुक असतो. इंग्लंड वेगळ्या शैलीत खेळतात. ते मला पूर्णपणे कळत नाही. गोलंदाजी युनिट म्हणून आमच्यात आत्मविश्वास आहे. फलंदाज जेव्हा आक्रमक खेळतात तेव्हा लवकर विकेट घेण्याची शक्यता असते.’
बुमराहने पुढे सांगितलं की, ‘कोणत्याही खेळाडूसाठी प्रत्येक फॉरमेट सतत खेळणं सोप नसते. मी हे खूप दिवसांपासून करत आहे. पण एका विशिष्ट वेळेनंतर तुम्हाला समजून घ्यावे लागेल की शरीर कोणत्या दिशेने जात आहे. कोणती स्पर्धा सर्वात महत्त्वाची आहे. म्हणून एखाद्याला आपल्या शरीराचा वापर कसा करायचा याबद्दल थोडे शहाणपण असायला हवे.’