बोगोटा : पहलगाम हल्ल्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करणारे विधान कोलंबियाने मागे घेतले. भारतीय शिष्टमंडळाने पाकिस्तानकडून दहशतवादाला कायम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर हे विधान मागे घेतले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ही माहिती दिली. कोलंबियाचे उपपरराष्ट्रमंत्री रोसा व्हिलाविसेन्सिओ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर विधान मागे घेतल्याचे थरूर यांनी स्पष्ट केले.
गेल्या दोन दिवसांत, नऊ सदस्यीय भारतीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कोलंबियाच्या वरिष्ठ राजकीय नेत्यांसोबत बैठका घेऊन पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली होती. पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी दहशतवादाला प्रोत्साहन देत आला आहे. कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांना याबाबत माहिती दिली, असे थरूर यांनी सोशल मीडिया पोस्टवर म्हटले आहे.
‘‘मी कोलंबियाला अलीकडील घटनांसंदर्भात भारताचा दृष्टिकोन स्पष्ट केला. शोक व्यक्त करण्याच्या कोलंबियाच्या विधानावर मी निराशा व्यक्त केली होती. त्यानंतर मंत्र्यांनी मला हे विधान मागे घेत असल्याचे सांगतिले. भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला कोलंबियाचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे,’’ असेही थरूर यांनी म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यासाठी नऊ जणांचा समावेश असलेले सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेले असून, थरूर त्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या प्रतिनिधिमंडळाने कोलंबियात येण्यापूर्वी गयाना, पनामा या देशांचा दौरा केला.