माऊंट एव्हरेस्ट हे फक्त शब्द जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर येते ती हिमालयाची भव्यता आणि दोन नावं, एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे. एव्हरेस्ट सर करणं हे जगातील प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. गिर्यारोहकच काय प्रत्येकालाच माऊंट एव्हरेस्टची भुरळ पडलेली असते.
माऊंट एव्हरेस्ट म्हणजे साहस, शारीरिक आणि मानसिक क्षमतेची कसोटी आणि एक अगम्य गूढ, जे आजही अनेकांना आकर्षित करतं.
एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे या दोघांनी 1953 मध्ये एव्हरेस्ट सर करत एक इतिहास घडवला. त्यांच्या या ऐतिहासिक मोहिमेबद्दल आजदेखील तितकंच कुतुहल आहे.
कारण आजच्या आधुनिक काळातदेखील एव्हरेस्ट सतत हुलकावणी देत असताना त्याकाळात या दोघांना किती आव्हानांना तोंड द्यावं लागलं असेल, किती वेळा मृत्यूशी गाठ पडली असेल याची कल्पना आपण करू शकतो.
हिलरी आणि तेनझिंग यांच्या यांची ही साहसी एव्हरेस्ट मोहीम नेमकी कशी पार पडली याबद्दल जाणून घेऊया.
माऊंट एव्हरेस्ट सर करताना एडमंड हिलरी आणि तेनझिंग नोर्गे यांना अनेक अडचणींना तोंड देत उंच डोंगरकड्यावर किंवा खडकावर चढाई करावी लागली. हे करताना त्यांना पर्वताच्या सर्वात धोकादायक आणि कठीण भागात, अत्यंत धोकादायक, बेभरवशाच्या बर्फाला आणि ऑक्सिजनच्या तुटवड्याला झुंज द्यावी लागली.
72 वर्षांपूर्वी त्यांनी त्यांच्या एव्हरेस्ट सर करण्याच्या या पराक्रमाची कहाणी बीबीसीला सांगितली होती.
"मला वाटतं माझी पहिली प्रतिक्रिया ही सुटकेचा नि:श्वास सोडण्याची होती," असं न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी 3 जुलै 1953 ला बीबीसीला सांगितलं होतं. त्यांनी आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे या दोघांना पृथ्वीवरील सर्वात उंच शिखरावर उभं राहताना काय वाटलं होतं, याचं वर्णन करताना हिलरी यांनी हे उद्गार काढले होते.
"दिलासा या गोष्टीचा की, आम्हाला शिखर सापडलं होतं आणि दिलासा या गोष्टीचा की आम्ही तिथे पोहोचलो होतो," असं हिलरी म्हणाले होते.
तेनझिंगही म्हणाले होते की, शिखरावर पोहोचल्यावर त्यांच्या मनात येणारी पहिली भावना म्हणजे शिखरावर पोहोचल्याचा "प्रचंड दिलासा, सुटकेचा नि:श्वास" आणि त्यानंतर आनंदाची भावना.
तेनझिंग यांनी या भावना त्यांचे अनुवादक आणि त्या मोहिमेचे टीम लीडर कर्नल जॉन हंट यांच्यामार्फत व्यक्त केली होती. कारण ते अस्थिर अशा बर्फाळ प्रदेशातून आणि कडाक्याच्या थंडीतून बचावत शिखरावर पोहोचले होते.
माऊंट एव्हरेस्ट आणि डेथ झोन या नावांचा उगमकारण जगातील या सर्वात उंच शिखरावर म्हणजे माऊंट एव्हरेस्टवर उभं राहण्यासाठी या दोघांनीही पर्वताच्या सर्वात धोकादायक भागात 40 फूट उंचीचा एक अभेद्य चढ किंवा खडक चढण्यात यश मिळवलं होतं. हाच तो माऊंट एव्हरेस्टवरील कुप्रसिद्ध "डेथ झोन".
माऊंट एव्हरेस्टची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल 8,849 मीटर (29,032 फूट) आहे. नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या या पर्वताला अनेक नावं आहेत. 1856 मध्ये ब्रिटिशांनी, सर्व्हेयर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून या पर्वताला 'माऊंट एव्हरेस्ट' हे नाव दिलं होतं.
मात्र, नेपाळमध्ये स्थानिक पातळीवर हा पर्वत 'सागरमाथा' म्हणून ओळखला जातो. तर तिबेटमध्ये हा पर्वत 'चोमोलुंगमा' या नावानं ओळखला जातो. त्याचा अर्थ तिबेटी भाषेत जगाची देवी असा होतो.
माऊंट एव्हरेस्टच्या विशिष्ट भागाला एडवर्ड वायस-डुनंट यांनी 'डेथ झोन' हे नाव दिलं होतं. ते डॉक्टर होते आणि 1952 मध्ये पर्वताचं मोजमाप करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या टीमचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. तेनझिंग नोर्गेदेखील या मोहिमेचे सदस्य होते.
डुनंट यांनी हे नाव गिर्यारोहक पर्वतावर ज्या उंचीवर पोहोचतात त्याला सूचित करताना दिलं होतं.
समुद्रसपाटीपासून 8,000 मीटर (26,000 फूट) उंचीवर हवेतील ऑक्सिजन कमी किंवा विरळ होऊ लागतो आणि त्याचा गिर्यारोहकांच्या शरीरावर विनाशकारी परिणाम होऊ लागतो, त्यांच्या शरीरातील पेशी मरण्यास सुरुवात होते.
माऊंट एव्हरेस्टवर चढाई करताना मृत्यूमुखी पडलेल्या बहुतांश गिर्यारोहकांचा मृत्यू याच डेथ झोनमध्ये झाला आहे.
हिलरी आणि तेनझिंगनं काय केलंअशा प्रकारच्या अत्यंत थंड वातावरणात, वादळी, क्रूर वाऱ्यांमध्ये आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी क्षमता, मानवी शरीरात उत्कांतीमध्ये निर्माण झालेली नाही.
एवढ्या उंचीवरील विरळ वातावरणामुळे गिर्यारोहकांना हायपोक्सिया होतो. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एकेक अवयव निकामी होत शरीर गतप्राण होतं.
मेंदू आणि फुफ्फुसाला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा न झाल्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढतात. परिणामी त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
मेंदूला ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्यामुळे त्याला सूज येते, डोकेदुखी, मळमळ होते. त्यामुळे गिर्यारोहकाची निर्णय घेण्याची आणि अंदाज घेण्याची क्षमता कमी होते. विशेषकरून ते तणावाखाली असतात तेव्हा याचा अधिक परिणाम होतो.
गिर्यारोहकांच्या मेंदूला सूज आल्यामुळे त्यांना भ्रम होणं, तिथे नसलेल्या लोकांशी बोलणं, बर्फ खोदणं किंवा स्वत:चे कपडे काढणं अशा प्रकारच्या अनुभवाला तोंड द्यावं लागतं.
मोहिमेतील इतर गिर्यारोहकांसह तेनझिंग आणि हिलरी हिमालयातील या अत्यंत प्रतिकूल आणि कठोर परिस्थितीशी हळूहळू जुळवून घेण्याची योजना आखली होती.
त्यासाठी त्यांनी जसजशी उंची वाढत गेली तसे ते तंबू ठोकत तिथल्या वातावरणाशी सरावत गेले, असं त्यांनी 1953 च्या एप्रिल आणि मे महिनाभर केलं होतं.
या पद्धतीनं ते हळूहळू पर्वत चढत राहिले. यामुळे त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्याची आणि अधिक हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी त्यांच्या शरीराला वेळ मिळाला. हिमोग्लोबिन म्हणजे लाल रक्तपेशींमधील प्रथिन जे फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करतं.
यातून ते एव्हरेस्टच्या शिखराकडे जात असताना शरीरातील कमी होत जाणाऱ्या ऑक्सिजनची भरपाई त्यांना करता आली. मात्र, याप्रकारे हवामानाशी जुळवून घेणं हे देखील त्या टीमसाठी धोक्याचं होतं.
कारण रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप वाढल्यानंतर रक्त तुलनेनं घट्ट होतं. यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया अधिक कठीण होते. त्यातून ह्रदयविकाराचा झटका येण्याची आणि फुफ्फुसात द्रव जमा होण्याची शक्यता वाढते.
मात्र 6000 मीटर (19,700 फूट) उंचीच्या वर तिथल्या वातावरणाशी शरीराला जुळवून घेणं जवळपास अशक्य आहे. हिलरी आणि तेनझिंग यांच्या टीमला तर समुद्रसपाटीपासून 8,790 मीटर (28,839 फूट) उंचीवरील उभ्या खडकावर चढाई करायची होती.
त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गिर्यारोहकांनी त्यांच्यासोबत विशेष डिझाइन करण्यात आलेले ऑक्सिजन उपकरण आणलं होतं. यामुळे गिर्यारोहकांना या उंचीवरील वातावरणामुळे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यास मदत होणार होती.
मात्र तरीदेखील त्यांच्यासमोर किती प्रचंड आव्हान आहे, याबद्दल त्यांच्या मनात कोणताही भ्रम नव्हता.
तीन दिवसांपूर्वीच, टॉम बॉर्डिलॉन आणि चार्लस इव्हान्स यांची मोहिमेतील प्राथमिक गिर्यारोहक टीम एव्हरेस्ट शिखरापासून फक्त 100 मीटर (328 फूट) अंतराच्या आत पोहोचली होती.
मात्र, ऑक्सिजन सेटमध्ये बिघाड निर्माण झाल्यानं आणि गोठवणाऱ्या वाऱ्यांचा तडाखा बसल्यामुळे हे दोघेजण चढाई करताना प्रचंड थकले होते. त्यामुळे शिखराजवळ पोहोचून देखील शिखर सर न करताच त्यांना माघारी वळावं लागलं होतं.
शेवटच्या टप्प्याचं जीवघेणं आव्हान29 मे 1953 च्या पहाटे तेनझिंग आणि हिलरी या दोघांनी या एव्हरेस्ट सर करण्याचा या मोहिमेतील दुसरा प्रयत्न केला. ते उघड्या कड्याच्या बाजूनं बर्फातून मार्ग काढत पुढे सरकू लागले.
बर्फाळ कड्यांवरून ते दोघे चढाई करत असताना, हिलरी यांना ते पुढे जाऊ शकतील की नाही याबद्दल शंका येऊ लागली, असं हिलरी यांचे पुत्र पीटर यांनी 2023 मध्ये बीबीसी विटनेस हिस्ट्रीला सांगितलं होतं.
"मला सर्वात जास्त आठवणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्यांनी शिखराच्या दक्षिणेकडून उंच बर्फाचे कडे चढून जाण्याचं केलेलं वर्णन.
ते म्हणतात की, ते पुढे होते. बर्फात पायऱ्या कोरत पुढे जात होते, बर्फाचा मोठा थर सैल होत होता आणि एव्हरेस्टच्या कांगशुंग फेस (पूर्वेकडचा भाग) वरून उतारावरून तिबेटमध्ये पडत होता."
पीटर म्हणाले की "मी हे त्यांच्या डायरीतदेखील पाहिलं आहे. तिथल्या परिस्थितीबद्दल, तिथून पुढे जाणं सुरक्षित आहे की नाही, याबद्दल त्यांना काही शंका येऊ लागल्या. मला नेहमीच आठवतं ही गोष्ट सांगताना त्यांच्या डोळ्यात चमक आणि कठीण परिस्थिती दाखवणारं स्मित असायचं."
"त्यांनी तेनझिंगकडे पाहिलं आणि दोघं एकमेकांकडे पाहून हसले आणि त्या परिस्थितीतही ते पुढं जात राहिले."
एडमंड हिलरी यांचे साथीदार तेनझिंग यांना वाटलं की, ही त्यांची नियती आहे. त्यांना वाटलं की "त्यांना या पर्वताची ओढ होती. त्यांच्यासाठी हा एक विशेष पर्वत होता," असं तेनझिंग यांचे पुत्र जामलिंग नोर्गे यांनी 2023 मध्ये बीबीसी विटनेस हिस्ट्रीला सांगितलं होतं.
जॅमलिंग पुढे म्हणाले होते, "21 वर्षांहून अधिक कालावधीत त्यांनी सहा वेळा हा पर्वत सर करण्याचा प्रयत्न केला होता. स्विस टीमबरोबर एक वर्षापूर्वी त्यांनी केलेल्या प्रयत्नात ते शिखरापासून फक्त 400 मीटर अंतरावर पोहोचले होते. तिथून त्यांना माघारी यावं लागलं होतं. त्यांना नेहमीच वाटायचं की हा पर्वत त्यांना सर करावाच लागेल."
हिलरी आणि तेनझिंग या दोन गिर्यारोहकांच्या ध्येयासमोरचा शेवटचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे तो उघडा उभा चढ किंवा खडक होता. त्याचा पृष्ठभाग सपाट, गुळगुळीत होता. तिथे पाय ठेवण्यास किंवा हातानं पकडण्यास काहीही नव्हतं. त्यामुळे तो चढून जाणं अशक्य वाटत होतं.
तेनझिंग यांनी हिलरी यांना दोरी बांधलेली होती. हिलरी यांनी त्यांचं शरीर त्या खडकाच्या पृष्ठभागावर आणि जवळच्या बर्फाच्या कड्याच्या मध्ये असणाऱ्या एका अरुंद भेगेत अडकवलं. त्यावेळेस त्यांनी मनोमन प्रार्थना केली की तो बर्फ तिथून निसटून कोसळू नये.
त्यानंतर ते हळूहळू आणि कष्टानं वर चढले. ते जेव्हा शिखरावर पोहोचले तेव्हा त्यांनी ती दोरी तेनझिंग यांच्याकडे फेकली आणि मग तेनझिंगदेखील शिखरावर चढले.
ज्या उभ्या चढ किंवा खडकावर मात करून ते दोघं माऊंट एव्हरेस्ट सर करू शकले त्याला नंतर हिलरी यांच्या सन्मानार्थ 'हिलरी स्टेप' असं नाव देण्यात आलं. 2015 मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपात तो चढ, खडक नष्ट झाला.
1953 मध्ये एडमंड हिलरी बीबीसी बरोबर बोलताना म्हणाले होते की, "शेवटच्या काही क्षणांमध्ये आम्ही कड्याच्या बाजूनं चढत होतो आणि आम्हाला कड्याचं शिखर दिसत नव्हतं.
शिखर आमच्यापासून उजव्या बाजूला जात राहिलं. आम्ही शेवटच्या टप्प्यात आलो आणि आम्हाला कडा उत्तरेकडे जाताना दिसला."
"ती खूपच दिलासा देणारी बाब होती. त्यानंतर आम्ही वर पाहिलं आणि एव्हरेस्टचं शिखर आमच्यापासून फक्त 30, 40 फूट उंचीवर होतं. मग आम्ही वर चढून गेलो आणि शिखरावर पाऊल ठेवलं."
हे दोन गिर्यारोहक जगातील सर्वात उंच शिखरावर उभे राहिल्यानंतर, त्यांनी एकमेकांना आनंदानं मिठी मारली.
मग हिलरी यांनी त्यांचा कॅमेरा काढला आणि तेनझिंग ब्रिटन, भारत, नेपाळ आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या झेंड्यासह त्यांची बर्फात वापरायची गिर्यारोहकांची कुऱ्हाड उंचावत असल्याचे क्षण फोटोमध्ये टिपू लागले. तसंच जगाच्या शिखरावरून दिसणारी दृश्यं टिपू लागले.
तेनझिंग यांनी बर्फात एक खड्डा खणला आणि बौद्ध धर्माची प्रथा म्हणून मिठाई आणि बिस्किटं तिथं पुरली.
सांघिक प्रयत्नातून एव्हरेस्ट सर1953 मध्ये बीबीसीशी बोलताना हिलरी म्हणाले होते, "बरं, तिथं भरपूर काळ राहील असं आमच्याकडे काहीही नव्हतं. पर्वताचं सर्वोच्च शिखर किंवा बिंदू म्हणून खूण करण्यासाठी तिथे दगडांचा ढिग बनवणं अशक्य होतं. कारण दगड, खडक शिखरापासून 30, 40 फूट खाली होते."
"तेनझिंग यांनी तिथे बौद्ध देवतांना अर्पण करण्यासाठी म्हणून काही अन्न ठेवलं आणि आम्ही एका दोरीवर चार ध्वजदेखील ठेवले. मात्र मला वाटत नाही की ते फार काळ तिथे टिकतील."
हिलरी आणि तेनझिंग या दोघांनी याच पर्वतावर जून 1924 मध्ये बेपत्ता झालेल्या जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू "सँडी" इर्विन या दोन गिर्यारोहकांचाही शोध घेतला.
एका पत्रकारानं मॅलरी यांना एव्हरेस्टवर का चढायचं आहे, असा प्रश्न विचारला असता, मॅलरी यांनी उत्तर दिलं होतं की "कारण ते तिथं आहे." त्यांचं हे उत्तर प्रसिद्ध झालं होतं.
हिलरी आणि तेनझिंग यांनी शोध घेतला मात्र त्यांना या दोन्ही गिर्यारोहकांबाबत काहीही सापडलं नाही.
अखेर 1999 मध्ये मॅलरी यांचा मृतदेह सापडला होता. तर 2024 मध्ये हिमनदीवरील बर्फ वितळल्यानंतर त्यांचा साथीदार अँड्र्यू "सँडी" इर्विन यांचे अर्धवट अवशेष समोर आले होते.
महत्त्वाची बाब म्हणजे जे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी तेनझिंग आणि हिलरी यांनी इतके अफाट प्रयत्न केले होते. त्या माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर, तेनझिंग आणि हिलरी फक्त 15 मिनिटंच होते.
हिलरी म्हणाले होते, "आमच्याजवळचा ऑक्सिजनचा साठा संपत आला होता, म्हणून आम्हाला लगेच पुन्हा खाली उतरायचं होतं."
हिलरी आणि तेनझिंग या दोघांनाही वाटत होतं की, एक सांघिक कामगिरीचा परिणाम म्हणून त्यांनी एव्हरेस्ट सर केलं आहे. त्यामुळे त्या दोघांनी एकमेकांशी एक करार केला की, शिखरावर पहिलं पाऊल कोणी ठेवलं हे कोणालाही सांगायचं नाही.
मात्र त्यामुळे वृत्तपत्रांमध्ये त्यांच्यातील नेमकं आधी एव्हरेस्टवर कोण चढलं याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते.
1955 मध्ये तेनझिंग यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव होतं 'टायगर ऑफ द स्नोज'. यात त्यांनी हिलरी आधी चढले होते असं सांगत या चर्चांना पूर्णविराम दिला.
खाली उतरताना आणि त्यांच्या बेस कॅम्पकडे परतताना हिलरी आणि तेनझिंग कमालीचे थकले होते. त्यावेळेस हिलरी यांचे न्यूझीलंडमधील सहकारी आणि गिर्यारोहक जॉर्ज लोव त्यांना भेटले.
हिलरी आणि तेनझिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केल्याची बातमी 2 जूनपर्यंत बाहेरच्या जगापर्यंत पोहोचली नव्हती. ती राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राज्याभिषेकाची पूर्वसंध्या होती.
राणीनं एडमंड हिलरी आणि कर्नल हंट यांना त्यांच्या कामगिरीबद्दल सन्मानित केलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावापुढे 'सर' ही पदवी वापरता येणार होती.
तर तेनझिंग यांना जॉर्ज मेडलनं सन्मानित करण्यात आलं. मात्र, त्यांनादेखील हिलरी आणि कर्नल हंट यांच्याप्रमाणेच समान पदवी का देण्यात आली नाही याबद्दल वाद निर्माण झाला.
एव्हरेस्टचं आजचं वास्तवत्यानंतरच्या काळात, हिलरी आणि तेनझिंग यांच्याप्रमाणेच एव्हरेस्ट सर करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. माऊंट एव्हरेस्टवरील मोहिमा हे नेपाळ सरकारसाठी उत्पन्नाचं एक प्रमुख साधन बनलं आहे.
दरवर्षी जवळपास 800 जण माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अजूनही एव्हरेस्टवर चढणं ही एक धोकादायक मोहीम आहे.
नेपाळ पर्यटन विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये एव्हरेस्टवर चढताना 9 जण मृत्यूमुखी पडले होते किंवा बेपत्ता झाले होते. त्याच्या आधीच्या वर्षी 18 जण मृत्यूमुखी पडले होते.
शतकभरापूर्वी नोंदी ठेवण्यास सुरुवात झाल्यापासून एव्हरेस्टच्या परिसरात 330 हून अधिक गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. यातील अनेक गोठलेले मृतदेह वर्षानुवर्षे पर्वतावरच राहिले आहेत. ते अनेकदा बर्फाखाली गाडले गेलेले असतात.
मात्र हवामान बदलामुळे जागतिक तापमान वाढ होत असल्यामुळे पर्वतावरील बर्फाचा थर आणि हिमनद्या वितळत आहेत. त्यामुळे हे मृतदेह आता समोर येत आहेत.
2019 मध्ये नेपाळ सरकारनं एव्हरेस्टच्या परिसरातील मृतदेह काढण्यासाठी स्वच्छता मोहीम सुरू केली. गेल्या वर्षी पहिल्यांदा स्वच्छता पथकातील गिर्यारोहकांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून एव्हरेस्टवरील सर्वात धोकादायक डेथ झोनवरून 5 मृतदेह बाहेर काढले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)