मुंबई : नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०२५) राज्यात झालेली परकी गुंतवणूक ही देशातील एकूण परकी गुंतवणुकीच्या ४० टक्के एवढी आहे. या विक्रमी परकी गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करीत राज्यातील जनता आणि गुंतवणूकदारांचे अभिनंदन केले आहे.
या आर्थिक वर्षाच्या (२०२४-२५) शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च २०२५) गुंतवणूक आकडेवारी जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये इतकी परकी गुंतवणूक झाली आहे. राज्यातील ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. यंदा देशात आलेली परकी गुंतवणूक ही ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपये इतकी आहे. राज्यातील गेल्या वर्षीच्या गुंतवणुकीचा विचार करता, यावर्षी झालेली गुंतवणूक ही त्यापेक्षा ३२ टक्के अधिक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपये इतकी परकी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत या वर्षाने गेल्या दहा वर्षांतील विक्रम प्रस्थापित केला आहे. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या नऊ महिन्यांतच मोडला होता, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यनिहाय गुंतवणूक (वर्षः २०२४-२५ एप्रिल-मार्च) (कोटी रुपयांत)कर्नाटक: ५६ हजार ०३०
गुजरात: ४७ हजार ९४७
दिल्ली: ५१ हजार ५४०
तमिळनाडू: ३१ हजार १०३
हरियाणा: २६ हजार ६००
तेलंगणा: २५ हजार ३५१
राजस्थान: ३ हजार १७०
झारखंड: ६१
उत्तर प्रदेश: ३ हजार ७००
राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भात विरोधकांकडून केले जाणारे आरोप निराधार असून इतर कोणत्याही खात्यांतून या योजनेसाठी निधी वळविण्यात आलेला नाही. विरोधकांनी अर्थसंकल्प समजून घेतल्याशिवाय वक्तव्ये करू नयेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री