… तर आरसीबीला अंतिम फेरीत जिंकणं कठीण होईल! आर अश्विनने दिला थेट इशारा
GH News May 30, 2025 06:08 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर फेरीत पंजाब किंग्सचा 8 विकेटने धुव्वा उडवला आहे आणि आरसीबीने अंतिम फेरी गाठली. आयपीएल इतिहासात आरसीबीने चौथ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण आरसीबीला एकदाही जेतेपदाची चव चाखता आली नाही. मागच्या 17 पर्वात आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न भंगलं आहे. आता पुन्हा एकदा हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आरसीबीकडे चालून आली आहे. जेतेपदापासून एक विजय दूर आहे. पण अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी कोण असेल? याचं गणित अजून ठरलेलं नाही. यासाठी दोन सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्जशी सामना करेल. जिंकणारा संघ अंतिम फेरीत खेळेल. पण आर अश्विनने अंतिम फेरीपूर्वीच आरसीबी चाहत्यांच्या पोटात गोळा आणला आहे. त्याने वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं तर पुन्हा एकदा पदरी निराशा पडेल.

आर अश्विन भाकीत वर्तवताना म्हणाला की, फक्त पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स अंतिम सामन्यात आरसीबीला हरवू शकेल. या हंगामात लीग टप्प्यात आरसीबी आणि मुंबई इंडियन्स फक्त एकदाच आमनेसामने आले आहेत. त्यात आरसीबीने वानखेडे स्टेडियमवरील सामना जिंकला होता. पण अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सशी दोन हात करणं म्हणजे खूपच कठीण होईल असं आर अश्विन म्हणाला. आरसीबीला आयपीएल ट्रॉफी जिंकायची असेल तर गुजरात टायटन्सने एलिमिनेटर फेरीतच मुंबईला पराभूत करावं अशी इच्छा आरसीबीच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

यूट्यूब चॅनलवर आर अश्विनने सांगितलं की, “जर आरसीबीला आयपीएल जिंकायचे असेल तर गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकावे लागेल. मुंबई इंडियन्स हा असा संघ आहे ज्याला तुम्ही अंतिम फेरीत प्रवेश देऊ शकत नाही. तुम्हाला त्यांना कोणत्याही किंमतीत रोखावे लागेल. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे ज्याला आरसीबीविरुद्ध काही संधी आहे. जर मी आरसीबी असतो तर मला गुजरात टायटन्सचा सामना करायला आवडेल.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.