शुबमनच्या डोक्यावर कॅप्टन्सीचा काटेरी मुकूट, विराट-ग्रॅमी स्मिथसारखी कामगिरी जमेल?
GH News June 01, 2025 12:06 AM

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्याला 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी जवळपास महिन्याभराआधी 24 मे रोजी बीसीसीआय टीम मॅनेजमेंटने नव्या भारतीय कसोटी कर्णधाराची घोषणा केली. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. शुबमन गिल यासह टीम इंडियाचा 37 वा कसोटी कर्णधार ठरला. शुबमन इंग्लंड दौऱ्यातून कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे. कॅप्टन्सीला काटेरी मुकूट म्हणतात. कॅप्टन्सीच्या दबावात अनेक खेळाडू फ्लॉप ठरतात. तसेच अपेक्षित कामगिरीही करता येत नाही. सचिन तेंडुलकर आणि एलिस्टर कूक या दिग्गज क्रिकेटपटूंना कर्णधार म्हणून काही खास करता आलं नाही. तर दुसर्‍या बाजूला विराट कोहली आणि ग्रॅमी स्मिथ या दोघांनी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी केली. त्यामुळे शुबमनसमोर कर्णधार म्हणून विराट आणि स्मिथसारखी कामगिरी करण्याचं आव्हान असणार आहे. या निमित्ताने विराट आणि स्मिथ यांनी केलेली कामगिरी कशी होती? तर सचिन आणि कूक कसे कमी पडले? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड दौरा म्हणजे कॅप्टन शुबमनसाठी आव्हानांची ‘कसोटी’

इंग्लंडमधील स्थिती ही निश्चितच वेगळी आहे. त्यामुळे शुबमनसमोर इंग्लंडमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान असणार आहे. त्यात विराट आणि रोहित या दोघांनी कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शुबमनला कॅप्टन आणि बॅट्समन या दोन्ही आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. शुबमनच्या कामगिरीवर शंका घेण्याची गरज नाही. मात्र शुबमनचा बॅटिंग रेकॉर्ड हा टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या प्रतिभेला शोभणारा नाही.

कॅप्टन्सीचा दबाव हा वेगळ्याच प्रकारचा असतो. कर्णधाराला जसं विजयाचं श्रेय मिळतं तसेच पराभवाची जबाबदारीही स्वीकारावी लागते. सत्तेसह जबाबदारीही येते, हे वाक्य जसं इतरांना लागू होतं तसं ते कर्णधारालाही लागू होतं. मात्र कॅप्टन्सीची जबाबदारी भलेभले दिग्गज पेलू शकले नाहीत. इंग्लंडचा एलिस्टर कूक आणि टीम इंडियाचा सचिन तेंडुलकर या 2 माजी खेळाडूंना कर्णधार म्हणून विशेष असं करता आलं नाही. या दोघांनी फलंदाज म्हणून कशी कामगिरी केलीय, हे सर्वांना माहितीय. मात्र या दोघांना कर्णधार झाल्यानंतर तसं करता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला कर्णधार होताच काही खेळाडूंच्या कामगिरीत कमालीची प्रगती झाली. यामध्ये विराट कोहली, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ, एलन बॉर्डर आणि मंसूर अली खान पतौडी यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

शुबमनची कामगिरी

शुबमन गिलने आतापर्यंत 32 कसोटी सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने 5 शतकं आणि 7 अर्धशतकांसह 1 हजार 893 रन्स केल्या आहेत. शुबमनने या सामन्यांमध्ये कधी ओपनर तर केव्हा तिसऱ्या स्थानी बॅटिंग केली. मात्र आता कॅप्टन्सी मिळाल्यानंतर शुबमनला त्याचं स्थान निश्चित करण्याची संधी आहे. त्याचा परिणाम शुबमनच्या आकडेवारीवर दिसायला हवा. शुबमनने परदेशात 6 सामन्यांमध्ये 352 रन्स केल्या आहेत. मात्र यात एकही शतक नाही. त्यामुळे शुबमनसाठी इंग्लंडचा पहिलाच पेपर हा आव्हानात्मक असणार आहे.

तसेच शुबमनने गेल्या इंग्लंड दौऱ्यातील 3 सामन्यांमध्ये 88 रन्स केल्या. तसेच शुबमनने दक्षिण आफ्रिकेतील 2 कसोटीत 74 तर विंडीजमधील 2 सामन्यांमध्ये 45 रन्स केल्यात. या ठिकाणी इतर फलंदाज चमकदार कामगिरी करत स्वत:ला सिद्ध करतात. मात्र शुबमनची अशी आकडेवारी आहे.

सचिन आणि कूकसोबत काय झालेलं?

सचिन तेंडुलकरच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये असंख्य वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. सचिनने सर्वाधिक 200 कसोटी सामन्यांमध्ये 51 शतकांसह 15 हजार 921 रन्स केल्या. सचिनने 200 पैकी 25 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं. सचिनने कर्णधार म्हणून 7 शतकांसह 51.35 च्या सरासरीने 2 हजार 54 रन्स केल्या. तसेच सचिनने फलंदाज म्हणून 68 तर कॅप्टन म्हणून 7 अर्धशतकं झळकावली. त्यामुळे सचिन या 2 भूमिकेत असताना त्याची कामगिरी कशी होती? यातील फरक हा आकडेवारीवरुन स्पष्ट होतो.

एलिस्टर कूक

एलिस्टर कूक यानेही त्याचा काळ गाजवला. कूक सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. कूकने वयाच्या 33 व्या वर्षी 2018 साली निवृत्ती घेतली. कूकने 161 कसोटी सामन्यांमध्ये 45.35 च्या सरासरीने 33 शतकांसह 12 हजार 472 धावा केल्या. तर कूकने कॅप्टन म्हणून 59 सामन्यांमध्ये 12 शतकांच्या मदतीने 46.57 च्या सरासरीने 4 हजार 844 रन्स केल्या. मी स्वत: एक बॅट्समन म्हणून खेळू शकलो नाही, असं कूकने कर्णधारपद सोडल्यांनतर मान्य केलं होतं.

शुबमनला विराट-स्मिथसारखी कामगिरी जमेल?

महेंद्रसिंह धोनी याने 2014 साली तडकाफडकी कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विराट कोहली याला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर फलंदाज म्हणून सरासरी कामगिरी करणाऱ्या विराटच्या कामगिरीत कॅप्टन होताच आमूलाग्र बदल पाहायला मिळाला.

विराटने पहिल्याच कसोटी सामन्यांमधील दोन्ही डावात शतक झळकावलं. विराटने 123 सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 30 शतकांच्या मदतीने 9 हजार 230 धावा केल्या. तर विराटने कर्णधार म्हणून 68 कसोटी सामन्यांमध्ये 54.80 च्या सरासरीने 20 शतकांसह 5 हजार 864 रन्स केल्या. या आकडेवारीवरुन विराटची फलंदाज आणि कर्णधार या 2 वेगळ्या भूमिकेत असताना कामगिरी कशी होती? हे स्पष्ट होतं.

ग्रॅमी स्मिथ

ग्रॅमी स्मिथ याला वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी 9 व्या सामन्यातच कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. स्मिथने 117 कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत 48.25 च्या सरासरीने 27 शतकांच्या मदतीने एकूण 9 हजार 265 धावा केल्या. स्मिथने कर्णधार म्हणून 109 सामन्यांमध्ये 25 शतकांच्या मदतीने 47.83 च्या सरासरीसह एकूण 8 हजार 659 रन्स केल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.