कोहिमा : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सात आमदारांनी आज पक्षबदल करत सत्ताधारी नॅशनॅलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (एनडीपीपी) प्रवेश केला आहे. यामुळे या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ शून्यावर आले आहे, तर मुख्यमंत्री निफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पक्षाचे बळ ३२ झाले आहे. तसेच, ६० सदस्यांच्या विधानसभेत या पक्षाला पूर्ण बहुमत प्राप्त झाले आहे.
नागालँडमध्ये २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सात जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनला होता. या निवडणुकीत ‘एनडीपीपी’ला २५, तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारही पक्ष सोडून सत्तेत सहभागी झाल्याने हा पक्षप्रमुख अजित पवार यांच्यासाठी धक्का असल्याचे मानले जात आहे. या आमदारांच्या सत्ताधारी पक्षातील सहभागाला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे.
कारवाईचा प्रश्न नाहीनागालॅंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पक्ष सोडल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, ‘‘नागालँडचे सात आमदार मध्यंतरी भेटून गेले. कामे होत नाहीत, अशी त्यांची तक्रार होती. सत्ताधाऱ्यांना समर्थन आहे. मी त्यांच्याशी बोलतो, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर मी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो. आसामच्या मुख्यमंत्र्यांनाही मध्यस्थी करण्यास सांगितले होते. मात्र, आता सातही आमदारांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाईचा प्रश्न येत नाही.’’