राज्यात लाडकी बहीण योजना हा एक गेम चेंजर ठरत आहे. या योजनेचा हजारो महिलांना लाभ होत आहे. मात्र या योजनेवरून विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधकांच्या टीकेला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'लाडकी बहिणीला फक्त १५०० रुपये देऊन सीमित ठेवायचं नाही, तर त्यांना लखपती बनवायचं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
पुण्यात प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यातील घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी लाभार्थी मेळावा व महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यााच्या बालेवाडी, म्हाळुंगे येथील मुख्य बॅडमिंटन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
लाडकी बहीण योजनेतून दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. पण आमचा उद्देश फक्त एवढ्यावर थांबायचा नाही, तर त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून दरवर्षी किमान १ लाख रुपये उत्पन्न मिळवून देणारी 'दीदी' बनवायची आहे. १ कोटी लाडक्या बहिणींना लखपती बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेबाबत काय म्हणाले?शिवराज सिंह चौहान यांनी केंद्र सरकारकडून २० लाख घरे दिली, त्यानंतर अजून १० लाख घरे मिळाली.
२०१९ मध्ये सरकार बदलल्यावर काही काळ हे काम थांबले होते, परंतु आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर कामाला गती मिळाली. ग्रामविकास विभागाने १०० दिवसांत २० लाख घरे मंजूर करण्याचे उद्दिष्ट होते, पण केवळ ४५ दिवसांत हे उद्दिष्ट पूर्ण केले.
पुढील टप्प्यात १० लाख घरांची यादी तयार झाली आहे. जुन्या लाभार्थ्यांपैकी एकही व्यक्ती वंचित राहणार नाही.
नवीन सर्व्हेसाठी केंद्राने परवानगी दिली आहे. तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सुरू झाले आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वसामान्य नागरिकासाठी घराचे स्वप्न दूर होते, पण पंतप्रधानहे स्वप्न साकार केलं. केंद्र अनुदान देतंय आणि आपणही त्यात भर घालून ५० हजार रुपये जास्त देत आहोत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांवर सोलर लावण्यात येणार असून, मोफत वीज, शौचालय, गॅस सिलिंडर यांचाही समावेश आहे.