श्रीनगर : पर्यटनाला पुन्हा चालना देण्यासाठी जम्मू- काश्मीर पर्यटन विभागाने महाराष्ट्र टूर ऑपरेटर्स असोसिएशन (एमटीओए) आणि जम्मू-काश्मीर हॉटेलियर्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला काश्मीरला’ (कश्मीर चलो) ही मोहीम सुरू केली आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण व्हावे, ठप्प झालेला पर्यटन व्यवसाय सुरू व्हावा, यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागाने एक बैठक आयोजित केली होती. त्यात महाराष्टातून आलेले सुमारे ६० टूर ऑपरेटरही सहभागी झाले होते.
अमरनाथ यात्रेला पाठबळ देण्याबरोबरच ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ हा लौकिक पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होईल, असे पर्यटन विभागाचे म्हणणे आहे. याबाबत मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरनंतर खोऱ्यातील स्थिती सुरक्षित आहे, याची आम्ही हमी देतो.
आम्ही काळजीपूर्वक पावले उचलत आहोत. गेले काही आठवडे देशासाठी कठीण गेले. पर्यटन ही संघर्षमुक्त आणि राजकारणापासून अलिप्त असलेली बाब असावी, यासाठी कटिबद्ध आहोत.”
प्रत्येक भारतीय पर्यटकाच्या हृदयात काश्मीरचे एक खास स्थान आहे. येथील जनतेची जिद्द आणि सरकारने उचललेली ठोस पावले पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी भक्कम पाया आहे. सुरक्षित पर्यटनाला चालना देणे आणि काश्मीरला भारतातील एक प्रिय पर्यटनस्थळ म्हणून पुनर्स्थापित करणे हे आमचे कर्तव्य आहे.
- विश्वजित पाटील, ‘एमटीओए’चे अध्यक्ष