धाराशिव : में महिन्यात दमदार पाऊस येत असल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महाल येथिल विलोभनीय नर-मादी धबधब्यापैकी कमी उंचीवरील मादी धबधबा वाहू लागला आहे. मे महिन्यात धबधबा वाहण्याची हि पहिलीच वेळ आहे.
या पावसामुळे तीर्थक्षेत्र तुळजापूर, नळदुर्गसह इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात (कुरनूर मध्यम प्रकल्प) सुमारे सत्तावीस टक्के पाणीसाठा झाला आहे. नळदुर्ग येथिल बोरी धरण पुर्ण क्षमतेने भरल्यांनंतर धरणाच्या सांडव्यातून पाणी प्रवाहीत झाल्यानंतरच किल्ल्यातील नर- मादी व शिल्लक हे धबधबे वाहतात.
अशी पर्वणी शक्यतो अर्धवुन अधिक पावसाळा संपल्यानंतर किंवा जुलै महिन्यानंतर येते मात्र पहिल्यांदाच चक्क में महिन्यात मादी धबधबा वाहू लागला आहे. तसेच में महिन्यात विस्तीर्ण भुईकोट किल्ल्यातील परिसर हिरवाईने नटल्याचे पहायला मिळत आहेत. सध्या सुट्ट्याचा काळ असल्यामुळे नळदुर्ग किल्ल्यात पर्यटकांचा गोंगाट दिसून येत आहे.
शुक्रवारी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला मात्र काही हौशी पर्यटक धोकादायक ठिकाणी सेल्फी घेत असल्याचे व पाणी महाल येथे काही तरुण पोहताना आढळून येत होते. यामुळे अपघाताचा धोका संभवतो. किल्ला प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नळदुर्ग किल्ला सध्या पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असून या खात्याकडे कमी मनुष्यबळ आहे. अशावेळी पर्यटकांची वाढत जाणारी संख्या पाहता पुरातत्त्व खात्या च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाणार आहे.