जळगाव : मुंबई आणि महाराष्ट्रात अधूनमधून मराठी विरुद्ध अमराठी वाद होताना दिसतो. अशावेळी शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे मराठी भाषेसाठी आक्रमक भूमिका घेताना दिसतात. अशातच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे आणि हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे,” असे वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आता भाजपा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut targets Amit Shah after Pratap Sarnaik states that Hindi is the dialect of Mumbai)
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आज (31 मे) उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला महाराष्ट्रात स्वाभिमानाने जगता यावे, मराठी माणसाला आणि मराठीला सन्मान मिळावा, यासाठी शिवसेनेची स्थापना केली आहे. मात्र आता स्वतःला बाळासाहेब यांचे वारसदार म्हणवणारे मराठीबाबत काय भूमिका मांडत आहेत, हे तुम्ही पाहत आहात. परंतु ती त्यांची भूमिका नसून भाजपा आणि अमित शहा यांची भूमिका आहे. कारण त्यांच्या (शिवसेना शिंदे गट) पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आहेत, त्यामुळे अमित शहा यांना जे हवे आहे, तेच हे लोकं बोलतात, अशा शब्दांत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा – Ladki Bahin Yojana : फूल ना फुलाची पाकळी म्हणून बहिणींना सव्वाअकरा रुपये देतील; राऊतांनी उडवली खिल्ली
मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, हिंदी आता मुंबईची बोलीभाषा झाली आहे. हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे. आपण मराठीला मातृभाषा म्हणतो, पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते, तर कधी इंग्रजी येते. त्यामुळे हिंदी आता आपली बोलीभाषा झाली आहे. ठाणे आणि मिरा-भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे. तेथील जनतेशी बोलताना मी शुद्ध मराठीत बोलतो. पण जेव्हा मी मिरा- भाईंदरच्या पुढे जातो, तेव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडते. मराठी आमची मातृभाषा आहे, आमची माय आहे, असे आपण म्हणतो. पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे. कारण लाडक्या बहिणींमुळे आम्ही आज 237 च्याही पुढे गेलो आहोत, असे वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
हेही वाचा – Thackeray Vs BJP : भाजपाला ‘चंदा’ देणाऱ्यांचा धंदा जोरात, ठाकरे यांचे टीकास्त्र