कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ आज पंचगंगा नदी पात्रात पाण्यावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या रंगाचा फेस दिसला. वळवाच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सांडपाणी नदीत मिसळले. सांडपाण्यातील डिटर्जंटचे प्रमाण अधिक असेल तर पाण्याला फेस येऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मात्र, अचानक पांढरा फेस दिसू लागल्याने नदी काठावर असणाऱ्या नागरिकांत गोंधळ निर्माण झाला.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले ओसंडून वाहू लागले. शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात जयंती नाल्यात येते. हा नाला खानविलकर पंप येथील पुलाजवळ अडवला जातो. नाल्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला सोडले जाते.
मात्र, पावसाळ्यात हे पाणी थेट नदीमध्ये मिसळते. या शिवाय शहरातील अन्य सहा नालेही नदीमध्ये मिसळतात. पावसामुळे जयंती नाल्यातील काळे सांडपाणी ओसंडून वाहत होते. सांडपाण्यात डिटर्जंटचे (साबण) प्रमाण अधिक असेल तर हे पाणी नदीत गेल्यावर होणाऱ्या घुसळणीमुळे पात्रातील पाण्यावर फेस येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे, तर पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात थेट डिटर्जंट सोडले गेले असेल तरीही अशा प्रकारे पाण्याला फेस येऊ शकतो. हीही शक्यता वर्तवण्यात येते. मात्र, सकाळी अचानक नदीपात्रातील पाण्याला फेस आल्याने नागरिकांत गोंधळ निर्माण झाला.
जयंती नाल्यातील सांडपाणी थेट नदीत मिसळले. यामुळे नदी पात्रातील पाण्याला फेस येऊ शकतो. शहरातील शंभर टक्के सांडपाणी पाईपमधून सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवणे हा यावरील कायमस्वरुपी उपाय आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
-उदय गायकवाड, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ)
नदीपात्रातील पाण्याला फेस येणे हे नैसर्गिक नाही. पाण्यात मोठ्या प्रमाणात डिटर्जंटयुक्त गेले किंवा थेट असे घटक गेले तर असा फेस येऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय याबद्दल निश्चित भाष्य करता येणार नाही.
- असावरी जाधव, विभागप्रमुख, पर्यावरण विभाग, शिवाजी विद्यापीठ