बलुचिस्तानमधील परिस्थिती आता पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे, सशस्त्र बलुच बंडखोरांनी शुक्रवारी पाकिस्तानमधील महत्त्वाचं शहर असलेलं सोराब शहर ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे, यासंदर्भात बलुच बंडखोरांकडून शहर ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बलुच बंडखोर शस्त्रांसह सोराब शहरामध्ये घुसले त्यांनी या शहरांमधील अनेक सरकारी कार्यालयं आपल्या ताब्यात घेतली आहेत, ज्यामध्ये पोलीस स्टेशन, बँक आणि इतर काही महत्त्वाच्या सरकारी कार्यालयाचा समावेश आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बलुच बंडखोरांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना आणि सुरक्षा रक्षकांना पळून लावलं आहे. कुठलाही गोळीबार किंवा संघर्ष न करता पोलीस आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती देखील समोर येत आहे, त्यानंतर या बलुच बंडखोरांनी सोराब शहरातील सरकारी कार्यालयांचा ताबा घेतला. पाकिस्तान सरकारला देखील काहीच करता आलं नाही.
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ने केलेल्या दाव्यानुसार त्यांनी पाकिस्तानमधील सोराब शहर ताब्यात घेतलं आहे, शहरावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आहे. येथील बँकेसह, पोलीस स्टेशन आणि इतर महत्त्वाची सरकारी कार्यालयं बलुच आर्मीने ताब्यात घेतली आहेत.आम्ही लवकरच या संदर्भातील सविस्तर माहिती सांगू असं बलुच लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता जियंद बलोच यांने म्हटलं आहे.
सोराब शहर पाकिस्तानसाठी किती महत्त्वाचं?
सोराब हे पाकिस्तानमधील अत्यंत महत्त्वाचं शहर आहे कारण हे शहर क्वेटा आणि कराची या पाकिस्तानमधील दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या महामार्गावर येतं. त्यामुळे रणनितीच्या दृष्टीकोणातून हा परिसर पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुराब या शहरावर बलुच बंडोखोरांनी नियंत्रण मिळवलं याचा अर्थ आता क्वेटा आणि कराची या दोन शहरांमध्ये सुरू असलेले दळणवळण देखील बलुच लिबरेशन आर्मीच्या नियंत्रणात आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे गुरुवारी अफगाणीस्तानचं सैन्य पाकिस्तानमध्ये घुसलं होतं. सीमावर्ती भागात जोरदार गोळीबार झाल्याची माहिती देखील मिळत आहे, या घटनेत पाकिस्तानचे काही सैनिक मारले गेल्याचं देखील वृत्त आहे, मात्र याला पाकिस्तानकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.