काटेवाडी, ता. ३१: सिद्धेश्वर निंबोडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची तसेच नीरा डावा कालवा दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिंगबर डुबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपअभियंता सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, पावसामुळे शेती, पिके, पशुधन, घरांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व पंचनामे करण्यात येत आहे. तसेच बाधित नागरिकांना अन्नधान्यही पुरविण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यात येईल.नीरा डावा कालवा फुटलेल्या ठिकाणी दुरुस्तीची तत्काळ कामे सुरु करावी. कालव्यामधील संपूर्ण राडारोडा काढून घ्यावा. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याकरिता कालव्याची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
दरम्यान, पवार यांनी रस्ता, पूल, कोसळलेली घरे आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
00929