Valmik Thapar : भारताचे 'टायगर मॅन' थापर यांचे निधन
esakal June 01, 2025 11:45 AM

नवी दिल्ली : भारताच्या वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील ख्यातनाम अभ्यासक अन् लेखक वाल्मीक थापर (वय ७३) यांचे शनिवारी सकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी निधन झाले. दिल्ली येथे १९५२ मध्ये जन्मलेल्या थापर यांनी राजस्थानातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या अभ्यास व संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. शशी कपूर यांच्या कन्या आणि प्रसिद्ध रंगकर्मी अन् अभिनेत्री संजना कपूर यांचे ते पती होत. त्यांना एक मुलगा आहे.

त्यांनी १९८८ मध्ये ‘रणथंभोर फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या सहभागाने व्याघ्रसंवर्धनाच्या उपक्रमांना चालना दिली. थापर यांचे वडील रोमेश थापर हे प्रसिद्ध पत्रकार होते. त्यांची मावशी रोमिला थापर या प्रसिद्ध इतिहासकार असून, चुलत भाऊ करण थापर हे नामवंत पत्रकार आहेत. थापर यांनी ‘डून स्कूल’मध्ये शिक्षण घेतल्यानंतर सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून (दिल्ली विद्यापीठ) समाजशास्त्रात सुवर्णपदकासह पदवी घेतली. ‘प्रोजेक्ट टायगर’ मोहिमेतील अग्रणी अन् आदर्श वनसंवर्धक फतेहसिंग राठोड हे त्यांचे गुरू होत.

५० वर्षांहून अधिक काळ वाघसंवर्धनासाठी झटणाऱ्या थापर यांनी १५० हून अधिक सरकारी समित्यांमध्ये काम केले. २००५ मध्ये ‘सरिस्का व्याघ्र प्रकल्पात’ वाघांच्या घटलेल्या संख्येची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारने स्थापन केलेल्या ‘टायगर टास्क फोर्स’चे ते सदस्य होते. या समितीच्या निष्कर्षांशी ते सहमत नव्हते. त्यानुसार त्यांनी अलिप्त नोंद सादर केली. ‘वाघ अन् मानव सहअस्तित्व राहू शकते’ या दृष्टिकोनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली अन् काही वनक्षेत्रे माणसांपासून पूर्णपणे मुक्त ठेवणे आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले.

थापर यांनी ‘लँड ऑफ द टायगर’, ‘टायगर फायर : ५०० इयर्स ऑफ द टायगर इन इंडिया’, ‘लिव्हिंग विथ टायगर्स’सारख्या ३० हून अधिक पुस्तकांचे लेखन किंवा संपादन केले. ‘बीबीसी’साठी ‘लँड ऑफ द टायगर’ (१९९७) ही सहा भागांची मालिका त्यांनी सादर केली होती. २०२४ मध्ये ‘माय टायगर फॅमिली’ या माहितीपटात त्यांनी रणथंभोरमधील आपल्या पाच दशकांच्या अनुभवांचे चित्रण केले. ‘प्रोजेक्ट चित्ता’बाबतही मत व्यक्त करताना त्यांनी भारतात आफ्रिकी चित्त्यांचे पुनर्वसन योग्य नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. ‘चित्त्यांसाठी भारतात आवश्यक अधिवास अन् शिकारयोग्य प्राण्यांची पुरेशी संख्या नाही, तसेच प्रशासनाला या बाबतीत पुरेसा अनुभवही नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले होते.

‘भारतीय वाघांचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते!’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी अशोक व्यक्त करताना नमूद केले, की आजचे ‘रणथंभोर’ थापर यांच्या अथक प्रयत्नांचे साक्षीदार आहे. जैवविविधतेबाबत त्यांचे ज्ञान विलक्षण होते. माझ्या मंत्रिपदाच्या काळात आमचा दररोज संवाद होत असे. पर्यावरणतज्ज्ञ नेहा सिन्हा यांनी त्यांना ‘भारतीय वाघांचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते’ असे संबोधले. निर्मल घोष यांनी ‘वाघ संरक्षणाचे शिखर’ असे संबोधून त्यांना अभिवादन केले. थापर यांच्या निधनामुळे केवळ भारताने नव्हे, तर अवघ्या जगाने व्याघ्रसंवर्धनासाठी लढणारा एक सजग, अभ्यासू आणि निःस्वार्थ योद्धा गमावला आहे. त्यांचे समर्पित निसर्गप्रेम आगामी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशी श्रद्धांजली त्यांना वाहण्यात आली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.