भोपाळ : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे देशाच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी आणि मोठी दहशतवादविरोधी कारवाई आहे. त्यामुळे ‘सिंदूर’ हे शौर्याचे प्रतीक झाले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. तसेच, पाकिस्तानकडून येणाऱ्या गोळ्यांना तोफांच्या गोळ्यांनी उत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आयोजित लोकमाता देवी अहिल्यादेवी महिला सशक्तीकरण महासंमेलनात ते बोलत होते. मोदी यांनी अहिल्यादेवींच्या स्मरणार्थ टपाल तिकीट आणि ३०० रुपयांच्या नाण्यांचे लोकार्पण केले. या कार्यक्रमात त्यांनी पहलगामवरील हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानबरोबर झालेल्या संघर्षाचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘देशात सिंदूर हे शौर्याचे प्रतीक झाले आहे. भारत हा संस्कृती आणि परंपरांचा देश असून, आपल्या परंपरेत सिंदूर महिलांच्या शक्तीचे प्रतीक आहे. नवरात्रात शक्तीपूजा करताना आपण कुंकू (सिंदूर) अर्पण करतो.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीयांचे केवळ रक्त वाहिले नाही, तर हा भारतीय परंपरेवरचा हल्ला होता. ते आपल्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी देशातील महिलाशक्तीला आव्हान दिले होते. हे आव्हानच दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांच्या अंतासाठी निर्णायक ठरले. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे दहशतवादाविरुद्धची देशातील सर्वांत मोठी ठरली. आपल्या लष्कराने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले, पण पाकिस्तानी लष्कराला त्याचा गंधही आला नाही.’’
अहिल्यादेवी होळकर या भारतीय वारशाच्या पालक होत्या. परकी शक्तींकडून हल्ले होत असताना त्यांनी देशातील मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षण केले. त्यांच्या तत्त्वज्ञानानुसारच, आमचे सरकार नागरिक देवो भव या मंत्रावर काम करत आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
‘महिला सशक्तीकरणाचा प्रयत्न’केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले. हे विधेयक नारीशक्ती वंदन अधिनियम म्हणून ओळखले जाते. त्यावर बोलताना मोदी म्हणाले, ‘‘यावेळी ७५ महिला खासदार झाल्या आहेत, ही संख्या वाढविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. दीर्घकाळापासून प्रलंबित असणारे महिला आरक्षणाचे विधेयक आता मंजूर झाले असून, आता संसद व विधिमंडळामध्ये महिला आरक्षण अस्तित्वात येणार आहे. भाजप सरकार प्रत्येक स्तरावर महिलांचे सशक्तीकरण करत आहे.’’ नौदलातील लेफ्टनंट कमांडर रूपा ए. आणि दिलना के. यांनी शिडाच्या बोटीवरून जगाला प्रदक्षिणा घातली असून, २५० दिवसांच्या प्रवासानंतर त्या नुकत्याच गोव्याला परतल्या. मोदी यांनी या दोघींचे अभिनंदन केले. ‘‘केवळ वाऱ्याच्या मदतीने या दोघींनी जगाला प्रदक्षिणा घातली आहे. त्या २५० दिवस समुद्रात होत्या, त्याची कल्पना तरी करा,’’ याकडे त्यांनी लक्ष वेधले.