अंबरनाथमध्ये टीओडी मीटरला काँग्रेसचा विरोध
आंदोलनाचा इशारा
अंबरनाथ ता. २ (वार्ताहर)ः बदलापूरनंतर आता अंबरनाथमध्येसुद्धा टीओडी मीटरला विरोध होत आहे. टीओडी मीटरसाठी नागरिकांवर सक्ती केल्यास आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे शहर अध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी संबंधित प्रशासनाला दिला आहे.
भरमसाठ वाढलेल्या वीजबिलातून नागरिकांची सुटका होतच नाही, तर केंद्र सरकारच्या वतीने नवीन आरडीएसएस ही योजना सुरू करण्यात आली. वाढत्या मागणीप्रमाणे वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने आरडीएसएस ही चार लाख कोटी रुपये खर्चाची योजना देशभर राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अंबरनाथमध्येसुद्धा नागरिकांच्या घरी व रहिवासी सोसायटीमध्ये मीटर बदली करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र टीओडी मीटर लावताना नागरिकांची परवानगी न घेताच सक्तीने लावले जात आहे. यामुळे बदलापूरनंतर आता अंबरनाथमध्येसुद्धा याला विरोध होत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी एमएसईडीसीएलला लेखी निवेदन दिले असून, टीओडी मीटरला विरोध केला आहे. ते लावण्यासाठी नागरिकांवर सक्ती होत असल्याने याच्या विरोधात शुक्रवारी (ता. ६) सकाळी ११ वाजता आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे.