मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्ससमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 203 रन्स केल्या. मुंबईसाठी तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, जॉनी बॅरिस्टो आणि नमन धीर या चौघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इतरांनीही चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 200 पार मजल मारता आली. मुंबईच्या फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. आता सर्वकाही गोलंदाजांच्या हातात आहे. विशेष म्हणजे मुंबईने आतापर्यंत सलग 18 वेळा यशस्वीपणे 200 धावांचा बचाव केला आहे. त्यामुळे आताही पलटण या धावांचा बचाव करत फायनलमध्ये पोहचणार की पंजाब इतिहास घडवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो सलामी जोडीला काही खास करता आलं नाही. या जोडीने 19 धावा जोडल्या. रोहित शर्मा 8 रन्स करुन आऊट झाला. त्यांनतर बॅरिस्टो आणि तिलक वर्मा या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 51 रन्सची पार्टनरशीप केली. बॅरिस्टोने 24 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरच्या मदतीने 38 रन्स केल्या. बॅरिस्टो बाद झाल्याने मुंबईचा स्कोअर 2 आऊट 70 असा झाला.
त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी मुंबईला मजबूती दिली. दोघांनी संधी मिळेल तेव्हा फटकेबाजी केली आणि मुंबईला 100 पार पोहचवलं. दोघेही सेट झाले होते. दोघांनी मैदानात चारही बाजूला फटके मारुन मुंबईला 142 धावांपर्यंत पोहचवलं. मात्र पंजाबने निर्णायक क्षणी 2 विकेट्स मिळवल्या. सूर्या आणि तिलक 1 बॉलच्या अंतराने आऊट झाले. सूर्यकुमारने 26 चेंडूत 3 सिक्स आणि 4 फोरसह 44 रन्स केल्या. तर तिलकने 29 बॉलमध्ये 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.
पंजाबसमोर 204 रन्सचं टार्गेट
सूर्या-तिलक सेट जोडी आऊट झाल्याने आता मुंबई इथून 200 धावांपर्यंत पोहचू शकेल का? अशी शंका उपस्थित केली जात होती. हार्दिक पंड्या, नमन धीर आणि राज बावा या त्रिकुटाने अखेरच्या काही षटकांमध्ये निर्णायक खेळी करत मुंबईला 203 धावांपर्यंत पोहचवलं. कॅप्टन हार्दिक पंड्याने 13 चेंडूत 15 धावा केल्या. नमन धीर याने 18 बॉलमध्ये 7 फोरसह 37 रन्स जोडल्या. तर राज बावा याने नाबाद 8 रन्स केल्या. पंजाबसाठी अझमतुल्लाह ओमरझई याने दोघांना आऊट केलं. तर कायले जेमीन्सन, मार्कस स्टोयनिस आणि युझवेंद्र चहल आणि विजयकुमार वैशाख या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.