इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत क्वालिफायर २ सामना पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे. पण या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसाला सुरुवात झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक निर्धारित वेळेतच झाली होती. पण सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर मध्येच ओसरत होता, तर मध्येच जोराची सर येत होती. त्यामुळे रात्री ९.३० वाजेपर्यंत सामना सुरू होऊ शकला नाही.
सामन्याला सुरुवात होण्यास जवळपास सव्वा दोन तास उशीर झाला. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या सामन्याआधी पावसाला सुरुवात झाल्यानंतर मात्र बीसीसीआयवर चाहत्यांकडून टीका होण्यास सुरुवात झाली.
कारण याआधी प्लेऑफमधील एलिमिनेटर आणि क्वालिफायर १ सामना हैदराबादला होणार होता, तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकातामध्ये होणार होता. मात्र ९ मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजनक परिस्थितीमुळे आयपीएल ९ दिवसांसाठी स्थगित झाली होती.
त्यानंतर १७ मे पासून पुन्हा उर्वरित स्पर्धेला सुरुवात झाली. पण उर्वरित १७ सामन्यांचे वेळापत्रकात बदल करण्यात आले. सामन्यांचे ठिकाणेही बदलण्यात आली. यात प्लेऑफमधील सामन्यांचाही समावेश होता.
बीसीसीआयने मान्सुनचे कारण देत हैदराबाद आणि कोलकाता येथील प्लेऑफचे सामनेही हलवले. २९ मे ते ३ जून दरम्यान पावसाची शक्यता असल्याने एलिमिनेटर आणि क्वालिफायर १ सामना हैदराबादमधून मुल्लनपूरला, तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकातामधून अहमदाबादला हलवण्यात आला.
मात्र आता अहमदाबादला पाऊस पडत असल्याने बीसीसीआयवर टीका होत आहे. कोलकातामध्ये सध्या पाऊस नाही. याच कारणाने बीसीसीआयच्या या निर्णयावर सोशल मीडियातून टीका होत आहे.
दरम्यान, क्वालिफायर २ सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. पंजाब किंग्सच्या संघात युजवेंद्र चहलचे पुनरागमन झाले आहे. तसेच मुंबई इंडियन्सने रिस टोप्लीला प्लेइंग इलेव्हनमध्ये रिचर्ड ग्लिसनच्या जागेवर संधी दिली आहे. ग्लिसनला छोटी दुखापत आहे.