मलकापूर : बालकामगारांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करावे, या मागणीसह बालकांच्या विविध समस्यांच्या मागणीचे येथील अवनी संस्थेच्या वतीने निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना दिले.
अवनी संस्था ३१ वर्षांपासून अनाथ, निराधार, वंचित, स्थलांतरित श्रमिकांची मुले, कचरावेचक महिलांची मुले, बालकामगार, बालभिक्षेकरी यांच्या अधिकारांसाठी काम करत आहे. संस्थेच्या बालकामगार, बालभिक्षेकरी मुक्तता व पुनर्वसन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात सर्वत्र बालकामगार व बालभिक्षेकऱ्यांचे सर्वेक्षण केले जाते.
संस्थेच्या सर्व्हेत मोठ्या प्रमाणावर बालकामगार, बालभिक्षेकरी आढळून येत आहेत. त्यांना मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करावे. या वेळी अवनी संस्थेचे कार्यकर्ते अमर कांबळे, रवी कुराडे, राधिका लोखंडे, शोभा सरतापे, संगीता खुडे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात बालकामगारांचा सर्व्हे नियमितपणे होत नसल्यामुळे बालकामगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राजरोसपणे जिल्ह्यात बांधकामांची ठिकाणे, हॉटेल, धाबे, गॅरेज, भाजीपाला मार्केट, स्वीट मार्ट याठिकाणी बालकांचा बालमजूर म्हणून वापर होत आहे, तरी नियमितपणे बालकामगारांचा सर्व्हे करण्यात यावा, सातारा एमआयडीसी, जुनी व नवीन औद्योगिक वसाहतीत अनेक बालकामगार असल्याचे दिसून आले आहे. तेथे तातडीने बालकामगार मुक्त करण्यासाठी धाडसत्र घेण्यात यावे.
संबंधित कारखानदारांवर त्वरित गुन्हे दाखल व्हावेत. जिल्हा बालकामगार मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून कृतिदलाची बैठक महिन्यातून एकदा आयोजित करावी, कायद्यातील तरतुदीनुसार जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात बाल कल्याण पोलिस अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांना द्याव्यात, दर महिन्याला कृती दलाची बैठक व्हावी, दर तीन महिन्यांनी धाडसत्र आयोजित करावे, जिल्ह्यातील बालकामगारांचे सर्वेक्षण व्हावे आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.