कोस्टल कर्नाटकच्या भटकंतीसाठी मराठी टक्क्याचे प्रमाण बरेच आहे. हा किल्ला शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत आणि नंतरच्या मराठा कालखंडातदेखील संबंधित होता. त्यामुळे आपलेही पाऊल या किल्ल्यावर पडलेच पाहिजे.
प्रत्येक फिरस्त्याला कोस्टल कर्नाटकच्या सफारीचे आकर्षण असतेच. या भागातली भटकंती ही रोड ट्रीप म्हणूनही प्रसिद्ध आहे. या भागात आलो की आपल्याला अक्षरशः आपल्या मराठमोळ्या कोकणच्या परिसरचा फील येत असतो. याला कारण म्हणजे कोकणच्या भूमीत जसे समुद्रकिनारे कौलारू घरे, नारळी-पोफळीच्या बागा पाहायला मिळतात तसेच समुद्राजवळ असलेले किल्लेही पाहायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार आपल्याला कोस्टल कर्नाटकच्या भागात अनुभवायला मिळतो. म्हणजेच या परिसरात कोकणचे भौगोलिक साम्य पाहायला मिळतेच; शिवाय गोकर्ण या ठिकाणाजवळ आपल्याला अतिशय सुरेख किल्ला पाहायला मिळतो. मिरजन असे त्याचे नाव.
विशेषतः या भागात धार्मिक स्थळे आणि समुद्रकिनारे पाहायला जाणाऱ्यांना हा तसा बोनसच; पण आवर्जून आणि अगदी वेळ काढून पाहायलाच पाहिजे या जातकुळीतला हा किल्ला आहे. अगदी आबालवृद्ध, बच्चे सहज हा किल्ला पाहू शकतात. हा किल्ला पनवेल- कोचीन- कन्याकुमारी महामार्गावर म्हणजेच गोकर्ण आणि मुरूडेश्वर अशा दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांच्या मधोमधच रस्त्याने आपल्याला लागतो. गोकर्णवरून पुढे निघालो की साधारण २१ किमी अंतरावर हा किल्ला आहे. या मुख्य हायवेपासूनच उजवीकडे मिरजन किल्ल्याकडे जाणारा एक छोटा रस्ता लागतो. मुख्य रस्त्यापासून किल्ला फक्त एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर आहे;
पण याचे वैशिष्ट्य म्हणजे तो हायवेवरून अजिबात दिसत नाही.
प्रवासाचे सारे सोपस्कार पार पाडत आपण या किल्ल्यापाशी आलो की क्षणभर आश्चर्यचकितच होतो. किल्ल्याची तटबंदी आणि बुरूज याभोवती केलेली हिरवळ आणि साफसफाई डोळ्याला जाणवते. या मागील कारणही आपल्या लक्षात येते, ते म्हणजे हा किल्ला केंद्र सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यामुळे या किल्ल्याला संरक्षित असे कवच मिळाले आहे. आपल्याला हा किल्ला निर्धारित वेळेतच म्हणजेच किल्ला फक्त सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच पाहता येतो.
भौगोलिकदृष्ट्या पहिले तर मिरजन किल्ला कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्याच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. त्यामुळे याचे सागरीक महत्त्व हे ओघानेच आले. इतिहास अभ्यासक असे म्हणतात, की उत्कृष्ट अशा स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा हा किल्ला भूतकाळातील अनेक लढायांचे ठिकाण होता. यासाठी ते एक संदर्भ असा देतात, की राणी चेन्नाभैरदेवी यांना सुरुवातीला १६व्या शतकात मिरजन किल्ला बांधला. या राणीने जवळपास ५४ वर्षे राज्य केले. तसेच या राणीचे किल्ल्यातही काही काळ वास्तव्य होते. याच राणीच्या कारकीर्दीत, मिरजन येथील बंदराचा उपयोग सुपारी, मिरपूड, मसाल्याचे पदार्थ हे सूरतला समुद्रामार्गे पाठवण्यासाठी केला जात असे. या व्यापारामुळे पोर्तुगीजांनी राणीला ‘मिरचीची राणी’ हे नाव दिले. काही संशोधनानुसार आदिलशाही सरदार शरीफ-उल-मुल्कचा इ.स. १६०८-१६४० या काळात या किल्ल्यावर अंमल होता; मात्र आदिलशाही राजवटीआधीदेखील हा किल्ला विजयनगर साम्राज्याचा साक्षीदार असावा. विजयनगर, आदिलशाहीनंतर हा किल्ला मसाल्यांच्या व्यापारासाठी पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. त्यामुळेच बहुधा या किल्ल्याच्या बांधकामात इस्लामिक आणि पोर्तुगीज या दोन्ही सत्तांचा प्रभाव दिसून येतो. याचा इतिहास अगदी शिवकाळापर्यंतही जातो.
दक्षिण दिग्विजय मोहिमेत शिवछत्रपतींनी गोकर्ण, कारवार, अंकोला, सदाशिवगड या कर्नाटकातील अनेक ठिकाणांबरोबर मिरजन किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. नंतरच्या कालावधीत म्हणजेच १७५७ मध्ये मराठ्यांनी मिरजन किल्ला ताब्यात घेतला होता. १७५५ मध्ये बेदनूरचा शेवटचा शासक बसप्पा नाईक यांच्या मृत्यूमुळे किल्ला ताब्यात घेण्यात आला; पण अखेरीस मे १७८३ ते मार्च १७८४ या कालावधीत मेजर टोरिआनोच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी या किल्ल्यावर कब्जा मिळवला. एकंदरीतच किल्ल्याचे स्थान आणि समुद्री व्यापाराच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व हे अधोरेखित होते. त्यामुळेच साहजिकच या किल्ल्यावर आपली सत्ता असण्यासाठी अनेक राजसत्तांनी प्रयत्न केल्याचे दिसून येते.
इतिहासात डोकावून झाले की मग या किल्ल्याचे अंतरंग हळूहळू उलगडायला सुरुवात करायची. अघनाशिनी नदीच्या काठावर असलेल्या या किल्ल्याचा प्रकार भुईकोट असल्यामुळे हा किल्ला कायमच सुरक्षित आणि शत्रूच्या हल्ल्यापासून वाचवा, यासाठी अनेक उपाययोजना केलेल्या दिसतात. याचाच एक भाग म्हणजे किल्ल्याच्या सर्व बाजूंनी भला मोठा खंदक खोदलेला दिसतो. भुईकोट किल्ल्याला खंदक हा असतोच. शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षणाचा उपाय म्हणून किल्ल्याभोवती असे खोल रुंद खंदक खोदण्याची पद्धत प्राचीनकाळी रूढ होती; पण आजमितीला जिथून आपण प्रवेश करतो तो खंदकाचा भाग तर पूर्णपणे बुजलेला आहे. बहुधा किल्ल्यात शिरण्यासाठी तत्कालीन कालखंडात एखादा काढून घेता येणारा असा पूल असावा. काही अभ्यासक असे सांगतात की शेजारी वाहत असलेल्या नदीचे पाणी खंदकात सोडून देत असे. संकटसमयी हा पूल मुख्य मार्गापासून वेगळा करण्याची सोयदेखील होती; पण एकंदरीतच चहूबाजूंच्या खंदकाचा बराचसा भाग आज मात्र बुजलेल्या अवस्थेत आहे. सध्या मात्र किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी एका बाजूने रस्ता केलेला आहे.
मिरजन गावापासून नदीचे मुख १२ किलोमीटर अंतरावर आहे. हे नदीच्या एका वळणावर एका खाडीत आहे, ज्याला तादरी खाडी म्हणतात. याच खंदकातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा. खंदकाला लागूनच लाल खडकातील किल्ल्याची दुहेरी तटबंदी आणि बुरूज आहेत. बांधकामात वापरलेले हे दगड म्हणजेच कोकणात विपुल प्रमाणात आढळणाऱ्या जांभा दगडात घडवलेले आहे. त्यामुळे या किल्ल्याला लाल असा नैसर्गिक रंग मिळाला आहे. खंदकाभोवती जर आपण चक्कर मारली तर तटाच्या बाजूने तळात खंदकात उघडणारे अनेक दरवाजे आहेत. बहुतेक हे सगळे चोर दरवाजे असावेत. शत्रूसैन्याला चकवा देण्यासाठी ही उपाययोजना तत्कालीन वास्तू-स्थापत्यात घडवली असावी. हा किल्ला जवळपास पाच हेक्टर एवढ्या परिसरात पसरलेला आहे. किल्ल्यामध्ये पुरातत्त्व विभागाने डागडुजीचे काम केले आहे. सध्या किल्ल्याला एकूण चार प्रवेशद्वारे दिसतात. यातील आपण ज्या प्रवेशद्वारातून किल्ल्यात येतो ते मुख्य प्रवेशद्वार. हे इतर प्रवेशद्वारापेक्षा भव्य आहे. या मुख्य प्रवेशद्वारावर रुंद पायऱ्या असून या पायऱ्या चढून जाताच आपला किल्ल्याच्या मुख्य भागात प्रवेश होतो. किल्ल्याच्या बुरूजांवर जाण्यास आतील बाजूने दगडी पायऱ्या अजूनही शाबूत आहेत. या बुरूजांवरून किल्ल्याचे खूप छान दृश्य दिसते.
किल्ल्याच्या स्थापत्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण भाग असणारा म्हणजे गुप्त मार्ग. एकमेकांना जोडणारे अनेक भुयारी मार्ग. शत्रू सैन्याकडून किल्ल्यावर अचानक हल्ला झाल्यास सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी या भुयारी मार्गांचा उपयोग केला जात असे; सद्यस्थितीत हे सारेच मार्ग बंद केलेले दिसतात. भुईकोट किल्ल्यात असणाऱ्या आणि खोदलेल्या विहिरीसुद्धा स्थापत्यकलेचे दर्शन घडवितात. किल्ल्यात असणाऱ्या सैन्याला पाण्याची गरज भागवण्यासाठी किल्ल्यात दोन मोठ्या विहिरी खोदलेल्या आहेत. या दोन्हीही विहिरींत उतरण्यासाठी सुंदर पायऱ्यांचे मार्ग आहेत. हेही मार्ग बंद केलेले असल्यामुळे आपल्याला बाहेरूनच पाहावे लागते. याव्यतिरिक्त किल्ल्यामध्ये अनेक पडक्या इमारती, घरांची जोती, सदरेची जागा आणि पहारेकऱ्यांच्या खोल्या अशा अनेक गोष्टी या किल्ल्यात पाहता येतात. किल्ल्याच्या एका बाजूला म्हणजेच एका विहिरीपाशी हिंदू देवदेवतांच्या दगडी प्रतिमा एका मोठ्या झाडाखाली ठेवलेल्या दिसतात. सदरेची जागा किंवा दरबार हॉलची जागा छोटीशी; पण तिची रचना मात्र आवर्जून पाहावी अशीच आहे. संपूर्ण
किल्ला व्यवस्थित पाहण्यास साधारण दोन तास तरी हाताशी हवेतच.
एकंदरीतच हा किल्ला कमी श्रमात पाहून होणारा तर आहेच, शिवाय अगदी रस्त्याच्या जवळ असल्यामुळे वेळही वाचवणारा आहे. कोस्टल कर्नाटकच्या भटकंतीसाठी मराठी टक्क्याचे प्रमाण बरेच आहे. किल्ला हा तसा समस्त मराठीजनांना आवडणारा प्रकार. त्यातच हा किल्ला शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत आणि नंतरच्या मराठा कालखंडातदेखील संबंधित होता. त्यामुळे आपलेही पाऊल या किल्ल्यावर पडलेच पाहिजे.